मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सहाव्या दिवशीही सुरू आहे.
परभणी, लातूर, बीड, धाराशिव आणि नांदेडमध्ये आंदोलनाची तीव्रता वाढली; शाळा-महाविद्यालये बंद, कंधारमध्ये ‘शोले’ स्टाईल आंदोलन
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सहाव्या दिवशीही सुरू आहे. त्यांच्या प्रकृतीत सातत्याने बिघाड होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचा रोष वाढला असून, सरकारच्या भूमिकेच्या निषेधार्थ आज संपूर्ण मराठवाड्यात बंद पुकारण्यात आला आहे. परभणी, लातूर, बीड, धाराशिव आणि नांदेड या पाच जिल्ह्यांत बंदला प्रतिसाद मिळत असून अनेक ठिकाणी बाजारपेठा आणि व्यवहार ठप्प झाले आहेत.
आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने महत्त्वाच्या चौकांसह महामार्ग आणि शासकीय कार्यालयांच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. आंदोलन शांततेच्या मार्गाने पार पाडावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणावर लवकर तोडगा निघाला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिला आहे.
परभणी जिल्ह्यात सकल मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शैक्षणिक संस्थांमध्ये आज शुकशुकाट आहे.
लातूरमध्येही बंदचा मोठा परिणाम जाणवत आहे. औसा, अहमदपूर आणि मुरुडसह जिल्ह्यातील विविध भागांत दुकाने आणि मुख्य बाजारपेठांमधील व्यवहार बंद आहेत. शाळा-महाविद्यालयांनाही सुट्टी देण्यात आली असून आंदोलकांकडून भव्य रॅली काढण्यात येत आहे.
बीड जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी बंदची हाक दिली आहे. जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असतानाही शासनाकडून शिष्टमंडळ पाठवले जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
धाराशिव जिल्ह्यातही व्यापाऱ्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तुळजापूर, लोहारा, उमरगा, भूम, परंडा, वाशी आणि कळंब या तालुक्यांमध्ये अनेक व्यापाऱ्यांनी दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली आहेत.
दरम्यान, नांदेडमध्ये बंदच्या आवाहनावरून वेगवेगळ्या गटांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. एका गटाने आज, ३ सप्टेंबर रोजी बंद आणि रास्ता रोकोची हाक दिली आहे, तर दुसऱ्या गटाने ४ सप्टेंबरला जिल्हा बंदचे आवाहन केले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तसेच पोलीस प्रशासनात कायदा-सुव्यवस्थेबाबत संभ्रमाचे वातावरण आहे.
नांदेडच्या कंधारमध्ये मराठा कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या इमारतीवर चढून आंदोलन केले. ‘शोले’ स्टाईलने करण्यात आलेल्या या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी कारवाई करत सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, अंतरवाली सराटीतील जरांगे पाटील यांच्या उपोषणाकडे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागले असून, सरकारकडून तोडगा निघतो का, याकडे आंदोलकांसह नागरिकांचे लक्ष आहे.