Manora Bypass Road: मानोरा शहरात बायपास रस्त्याची पाहणी करण्यात आली. शेतकरी संघटना याबाबतच्या आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधण्याचे प्रयत्न करत आहेत.
परिवर्तन शेतकरी संघटनेचा पाठपुरावा
मानोरा (Manora Bypass Road) : शहराचे वाढते विस्तारीकरण व नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाल्याने शहरातून मोठ्या प्रमाणात जड वाहनाची वाहतूक होत असल्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा अडचणीचा सामना करावा लागत आहे. ट्रक, टिप्पर सारख्या जड वाहनामुळे मानोरा शहरातील मुख्य रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोडी निर्माण होते, पादचारी विद्यार्थी आणि नागरिकांना जीव मोठी धरून प्रवास करावा लागतो. शहरातून एकाच मुख्य रस्ता असल्यामुळे जड वाहतुकीची सततची वर्दळ नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे.
शहराच्या बाहेरून बायपास रस्ता काढणे आवश्यक आहे. या (Manora Bypass Road) बायपास रस्त्यासाठी परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने हिवाळी अधिवेशनात आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधण्याचे प्रयत्न करत ही मागणी लावून धरली असल्याने मागील आठवड्यात अकोला येथील सबंधित विभागाकडून बायपास मार्गाच्या पाहणी करण्यात आल्याने मागील तीन वर्षांपासून बिऱ्हाड आंदोलन, विधानभवनावर ठिय्या आंदोलन आमरण करत बायपास रस्त्याचे प्रश्न मांडत असून तत्कालीन मंत्री अतुल सावे दादा भुसे यांनी आंदोलना दरम्यान सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले होते. आता बायपास रस्त्याच्या मार्गाची पाहणी झाल्याने हा प्रश्न मार्गी लागण्याचे संकेत असल्याचे मत मनोहर राठोड यांनी व्यक्त केले.
मानोरा शहरातूनच मुख्य रस्ते असल्यामुळे शाळकरी मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागते तसेच धूळ आवाज आणि अपघाताचा धोका त्यामुळे येथील नागरिक सतत भीतीच्या वातावरणात मार्गक्रमण करतात. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार शहरातील होणारी ही जड वाहतूक थांबवून गावाबाहेरून बायपास रस्ता तयार करण्यात यावा, अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे. मात्र संबंधित प्रशासनाकडे याकडे अद्याप गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
मानोरा - विठोली या मधल्या रस्त्यांमधून मंगरूळपीर रस्त्यावरील सुभद्राबाई पाटील महाविद्यालयासमोर हा (Manora Bypass Road) बायपास रस्त्याच्या मागणीसाठी परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने मागील तीन वर्षापासून ही मागणी लावून धरत नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात वेगवेगळे आंदोलनही करण्यात आले. या आंदोलनाची दखल म्हणून मागील वर्षी तत्कालीन बहुजन विकास मंत्री अतुल सावे यांनी हे प्रश्न गांभीर्याने सोडविण्याचे आश्वासन दिले होते. याबाबत सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी विशेष लक्ष देत वेळोवेळी पाठपुरावा करीत असल्यामुळे नुकतीच बायपास रस्त्याच्या मार्गाची पाहणी करण्यात आल्याने हा बायपास रस्ता मंजूर झाल्यास शहराच्या विस्तारात व उभारणी मदत होईल. छोटे मोठे लघुउद्योग धंद्यांना चालना मिळत मानोरा शहराच्या सौंदीकरणात भर नक्कीच पडणार असल्याचे समाधानही मनोहर राठोड यांनी व्यक्त केले आहे.