Manora Bypass Road: मानोरा शहरातील वाहतूक कोंडी व अपघाताच्या समस्येवर तोडगा म्हणून बायपास रस्ता तयार करण्याचे काम सुरू होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरात दिली.
वाहतूक कोंडी, अपघात व प्रदूषणात वाढ!
अरुणावती बहुउद्देशिय संस्थेच्या मागणीला यश!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सा. बां. अप्पर मुख्य सचिवाना तातडीने कार्यवाहीचे निर्देश!
मानोरा शहराला वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा!
मानोरा (Manora Bypass Road) : वाशिम जिल्ह्यातील मानोरा शहरातून जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडी, अपघात आणि प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर शहरासाठी बायपास रस्ता तातडीने तयार करण्याची मागणी अरुणावती बहुउद्देशिय संस्था, कोंडोली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
संस्थेचे सचिव संदेश बाबुराव पाटणकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मानोरा हे (Manora Bypass Road) अकोला ते नांदेड राष्ट्रीय महामार्गावर वसलेले असून आसपासच्या गावासाठी ते महत्त्वाचे व्यापारी व प्रशासकीय केंद्र आहे. गेल्या काही वर्षांत शहरातून जाणाऱ्या वाहनांची, विशेषतः जड वाहने, ट्रक आणि प्रवासी बस यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरातील रस्ते अरुंद असल्यामुळे नागरिक, विद्यार्थी आणि व्यावसायिकांना दैनंदिन प्रवासात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. (Manora Bypass Road) मानोरा शहराच्या बाहेरील परिसरातून जाणारा योग्य नियोजित बायपास रस्ता तयार झाल्यास शहरातील गर्दी कमी होईल तसेच अकोला ते नांदेड या मार्गावरील वाहतुकीस गती मिळेल. त्यामुळे प्रवासाचा कालावधी कमी होईल, अपघातांचे प्रमाण घटेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे निवेदनात नमूद केले आहे. वरील बाबींचा विचार करून सार्वजनिक बांधकाम विभाग व एमएसआरडीसी यांना आवश्यक कार्यवाहीसाठी निर्देश द्यावेत, अशी विनंती संस्थेने केली आहे. ही लोकांच्या दीर्घकालीन व अत्यंत आवश्यक मागणी असून, मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाने या प्रकल्पाला गती मिळेल, असा विश्वासही निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.
शहरातून जात असलेल्या मेन रोडवर नेहमीच ट्रॅफिक जाममुळे व्यावसायिक व नागरिक त्रस्त होते. मुख्यमंत्री कार्यालय मंत्रालयाचे उपसचिव अमोल पाटणकर यांच्याकडे मानोरा वाशीयांनी बाय पासची मागणी रेटून धरली होती. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंजुरात करून घेत बायपासचे काम मार्गी लावले. त्या अनुषंगाने १ मे महाराष्ट्र दिनापासून बायपासच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून प्राप्त झाली आहे.