Human-Wildlife Conflict: राज्यातील मानव-वन्यजीव संघर्षग्रस्त भागातील माकडे व वानरे पकडण्यासाठी नवीन दर 600 रुपये निश्चित केले गेले आहेत. यामुळे बचाव कार्याला गती मिळण्याची अपेक्षा आहे.
जवळा बाजार (Human-Wildlife Conflict) : राज्यातील मानव-वन्यजीव संघर्षग्रस्त भागातील माकडे (Rhesus Macaque) व वानरे (Semnopithecus entellus) यांना सुरक्षित पकडून अधिवासात सोडण्यासाठी शासनाने नवीन दर निश्चित केले आहेत. महसूल व वन विभागाने 22 एप्रिल 2026 रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी केला. या निर्णयानुसार, संघर्षग्रस्त माकड/वानर पकडून सुरक्षितपणे अधिवासात सोडल्यास प्रति माकड 600 रुपये दर अदा करण्यात येणार आहे. यापूर्वी 25 नोव्हेंबर 2025 च्या शासन निर्णयाने यासाठी कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली होती. मात्र लोकप्रतिनिधींकडून आर्थिक मापदंडात सुधारणा करण्याची मागणी वारंवार होत होती.
9 डिसेंबर 2025 रोजी वनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतही दरवाढीचा मुद्दा चर्चेला आला होता. त्यानंतर शासनाने या मागणीचा विचार करून दरात सुधारणा केली आहे. नवीन दर शासन निर्णयाच्या दिनांकापासून म्हणजेच 22 एप्रिल 2026 पासून लागू झाले आहेत.
शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे की, पूर्वीच्या 25 नोव्हेंबर 2025 च्या निर्णयातील इतर सर्व तरतुदी कायम राहतील. केवळ माकडे पकडून सोडण्याच्या दरात बदल करण्यात आला आहे. हा (Human-Wildlife Conflict) आदेश विशेष कार्य अधिकारी उदय चंद्रकांत ढगे यांच्या डिजिटल स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे. राज्यातील वाढत्या मानव-वानर संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या या निर्णयामुळे बचाव कार्याला गती मिळण्याची अपेक्षा आहे.