Solar Agriculture Pump Yojana: महाराष्ट्रातील कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सौर कृषी पंप योजनेतील अटी शिथिल करण्याची मागणी केली आहे.
हिंगोली (Solar Agriculture Pump Yojana) : कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी सौर कृषी पंप योजनेतील अटी शिथिल करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी १ जून २०२६ रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.
सध्या शेतकऱ्यांसाठी शेतीतील नवीन वीज जोडणी महावितरणमार्फत बंद करून त्याऐवजी (Solar Agriculture Pump Yojana) सौर कृषी पंप देण्याची योजना सुरू आहे. या योजनेत २.५ एकरपर्यंत शेतीसाठी ३ एचपी, २.५ ते ५ एकर शेतीसाठी ५ एचपी आणि ५ एकरपुढील शेतीसाठी ७.५ एचपी पंप शासन नियमानुसार दिला जातो. मात्र, सध्या भूजल पातळी खोल गेल्याने ३ एचपी पंप २०० फुटांवर पाणी उपसण्यास असमर्थ ठरत असल्याचे आमदार बांगर यांनी पत्रात नमूद केले आहे.
तसेच एकाच कुटुंबातील दोन मुले किंवा पती-पत्नी यांची प्रत्येकी २+२ एकर अशी एकूण ४ एकर जमीन असूनही ती वेगवेगळ्या नावावर असल्याने त्यांना ५ एचपी पंपासाठी पात्र धरले जात नाही व त्यांचे अर्ज नामंजूर होत आहेत, ही बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली. या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांच्या हिताचा हा प्रश्न ऊर्जामंत्र्यांकडे मांडून एकाच कुटुंबातील किंवा एकाच व्यक्तीची एकत्र जमीन गृहीत धरून पाणी खोलीनुसार वाढीव क्षमतेचा (Solar Agriculture Pump Yojana) सौर कृषी पंप मंजूर करावा, अशी मागणी आमदार बांगर (MLA Santosh Bangar) यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.