Chakur Basic Amenities: तालुक्यातील मौजा चाकूर येथे गेल्या अनेक वर्षांपासून विविध मूलभूत सुविधांचा अभाव असून ग्रामपंचायत माहुलीकडून गावाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला
पिण्याचे पाणी, रस्ते, गटार, शाळा व अंगणवाडीच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
मानोरा (Chakur Basic Amenities) : तालुक्यातील मौजा चाकूर येथे गेल्या अनेक वर्षांपासून विविध मूलभूत सुविधांचा अभाव असून ग्रामपंचायत माहुलीकडून गावाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यासंदर्भात चाकूर येथील समस्त ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी, ज्योती राजपुरोहित यांच्याकडे दि. ६ ऑगस्ट रोजी निवेदन देऊन तातडीने स्थळ पाहणी करून आवश्यक विकासकामे मंजूर करण्याची मागणी केली आहे.
मौजे चाकूर गावात अंदाजे २५० ते ३०० मतदार असून हे गाव गट ग्रामपंचायत माहुली अंतर्गत येते. ग्रामसेवक व सरपंच यांच्याकडे अनेक वेळा तोंडी तसेच लेखी स्वरूपात समस्या मांडूनही ठोस कार्यवाही झाली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गावातील पिण्याच्या पाण्याची नळपाणी पुरवठा योजना बंद असल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच गावातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असून पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचत असल्याने नागरिक व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
गावात योग्य गटार व सांडपाणी निचरा व्यवस्था नसल्यामुळे बुद्ध विहार परिसरात सांडपाणी साचत असल्याने अस्वच्छता निर्माण झाली आहे. विविध ठिकाणी शेणखत व कचऱ्याचे ढीग साचल्याने दुर्गंधी पसरत असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे. दरम्यान, जिल्हा परिषद शाळेतील किचन शेड जीर्ण व धोकादायक अवस्थेत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच गावातील अंगणवाडी इमारतही जीर्ण अवस्थेत असून लहान बालकांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या (Chakur Basic Amenities) सर्व समस्यांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून तसेच इतर उपलब्ध योजनांमधून तातडीने आवश्यक विकासकामे मंजूर करून पूर्ण करावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याशिवाय, ग्रामपंचायत माहुलीचे संबंधित ग्रामसेवक व सरपंच यांनी या समस्यांचे निराकरण आजपर्यंत का केले नाही, याबाबत लेखी खुलासा मागवून आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही करावी अशी मागणे चाकूर वासियांनी पंचायत समिती संवर्ग विकास अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन केली.