Mudkhed Farmer Elgar Morcha: मुदखेड तालुक्यात शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोठ्या शेकडो संख्येने एल्गार मोर्चा करून सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर टीका केली. डिझेल टंचाई, खत लिंकिंग, पीक विमा अडथळे
“आमच्यासारखे वागू नका” असे गाढवांवर लिहीत सरकारच्या धोरणांचा निषेध
नांदेड (Mudkhed Farmer Elgar Morcha) : मुदखेड तालुक्यातील शेतकरी प्रश्नांनी गंभीर स्वरूप धारण केल्याच्या पार्श्वभूमीवर आज तहसील कार्यालयावर शेकडो शेतकऱ्यांचा भव्य एल्गार मोर्चा धडकला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ता तथा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी गाडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात जिल्ह्याचे खासदार रविंद्र चव्हाण, उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, कार्याध्यक्ष तिरुपती कोंढेकर आणि शेतकरी नेते भगवान पाटील मनुरकर यांनी सहभाग नोंदवला. यावेळी खासदार रविंद्र चव्हाण यांनी भाजप सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर जोरदार टीका करत सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे केलेल्या दुर्लक्षाचा निषेध केला.
मुदखेड तालुक्यात मागील काही काळापासून डिझेल टंचाई, खत व बियाण्यांचा तुटवडा, युरिया खताचे सक्तीचे लिंकिंग, पीक विमा मंजुरीतील अडथळे, पीक कर्जातील समस्या आणि वाढत्या महागाईमुळे शेतकरी आर्थिक व मानसिक संकटात सापडला आहे. वारंवार निवेदने, पाठपुरावा आणि आंदोलन करूनही प्रश्न कायम असल्याने अखेर (Mudkhed Farmer Elgar Morcha) शेतकऱ्यांनी संतप्त एल्गार पुकारला.

या मोर्च्याचे विशेष लक्षवेधी वैशिष्ट्य म्हणजे आंदोलनात प्रतीकात्मक स्वरूपात आणण्यात आलेली गाढवे होती. गाढवांवर “आमच्यासारखे वागू नका” असे फलक लावून सरकारच्या धोरणांवर आणि प्रशासनाच्या असंवेदनशील भूमिकेवर तीव्र प्रहार करण्यात आला. शेतकऱ्यांशी होत असलेल्या दुर्लक्षाचा आणि अन्यायकारक वागणुकीचा हा प्रतीकात्मक निषेध असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
तहसील कार्यालय परिसर घोषणांनी दणाणून गेला. “डिझेल टंचाई हटवा”, “खत लिंकिंग बंद करा”, “पीक विमा मंजूर करा”, “शेतकऱ्यांना न्याय द्या” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी माजी नगरसेवक गोविंद दादा गोपणपल्ले, गंगाधर डांगे, करीम खासाब, नगरसेवक तथा शहर युवक काँग्रेस अध्यक्ष मुजीब पठाण, अविनाश चौदंते, खदिर भाई, संजय बोकेफोड, जिल्हा सरचिटणीस गिरीश कोत्तावार, सूर्यकांत चौदंते, सुभाष चौदंते, वेदांत शेवटे, शेख गौस भाई फुलवाले, खदिर खुरेशी, मोईन भाई फुलवाले, श्याम शिंदे, केशव शिंदे, विश्वनाथ पवार, शिवाजी वडजे, माणिक मुंगल, संभाजी गाडे, गणेश ढगे, यदुराज गाडे, विठ्ठल आचार्य, संभाजी पवार, प्रशांत मुंगल, नागोराव भांगे, हनुमान लखे, माधव अक्केमवाड यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
मोर्चानंतर तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन (Mudkhed Farmer Elgar Morcha) देण्यात आले. शेतकरी प्रश्नांवर तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा बालाजी गाडे पाटील यांनी दिला.