महाराष्ट्र शासनाने दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अनुदानात १००० रुपयांची वाढ केली आहे, आता त्यांना २५०० रुपये मिळणार.
पातूर : शासन निर्णय दिनांक १५ सप्टेंबर २०२५ नुसार दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानात १००० रुपयांची वाढ करण्यात आली असून आता लाभार्थ्यांना एकूण २५०० रुपये अनुदान डीबीटी (DBT) पद्धतीने देण्यात येत आहे. या अनुषंगाने लाभार्थ्यांचे UDID कार्ड (दिव्यांग प्रमाणपत्र) व आधार क्रमांक पोर्टलवर अद्ययावत करणे आवश्यक असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या पत्रानुसार तसेच जिल्हाधिकारी अकोला यांच्या आढावा बैठकीतील निर्देशानुसार संजय गांधी योजना व श्रावणबाळ सेवा राज्य योजना अंतर्गत येणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांचे UDID व आधार संलग्नीकरण करून माहिती डीबीटी पोर्टलवर अद्ययावत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
त्या अनुषंगाने पातूर तालुक्यातील कोणताही दिव्यांग लाभार्थी लाभापासून वंचित राहू नये यासाठी सर्व लाभार्थ्यांनी आपले UDID कार्ड झेरॉक्स, अद्ययावत आधार कार्ड व बँक पासबुकची झेरॉक्स प्रत आपल्या गावातील तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) किंवा संजय गांधी योजना कार्यालय, तहसील कार्यालय पातूर येथे दि. २० मार्च २०२६ पूर्वी जमा करावी.
तसेच दिव्यांग लाभार्थ्यांनी UDID पोर्टलवरून e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. यासंदर्भात आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करण्याचे आवाहन तहसीलदार, पातूर यांनी केले आहे.