Hingoli e-KYC: जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयीकृत, ग्रामीण आणि सहकारी बँकांमध्ये ई-केवायसीची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. 12 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारी
हिंगोली (Hingoli e-KYC) : जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयीकृत, ग्रामीण आणि सहकारी बँकांमध्ये ई-केवायसीची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. 12 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारी नुसार हिंगोली, वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ आणि सेनगाव या पाचही तालुक्यांमध्ये मिळून एकूण 12 हजार 252 लाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप पूर्ण झालेली नाही.
यात सर्वाधिक प्रलंबित प्रकरणे हिंगोली तालुक्यात आहेत. हिंगोली तालुक्यात एकट्या 3 हजार 680 प्रकरणे प्रलंबित आहेत. त्याखालोखाल कळमनुरी तालुक्यात 2 हजार 839, औंढा नागनाथमध्ये 2 हजार 118, सेनगावमध्ये 1 हजार 943 आणि वसमत तालुक्यात 1 हजार 672 प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती आहे.
बँकनिहाय पाहणी केली असता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जिल्हाभरात सर्वाधिक 4 हजार 941 प्रकरणे प्रलंबित आहेत. हिंगोली शहरातील एसबीआय शाखेतच 1 हजार 336 प्रकरणे आहेत. याशिवाय कळमनुरीत 1 हजार 244, वसमत 865, औंढा 790 आणि सेनगावमध्ये 706 लाभार्थ्यांची ई-केवायसी बाकी आहे. दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे. या बँकेत जिल्ह्यात एकूण 2 हजार 680 प्रकरणे प्रलंबित आहेत. यात सेनगाव तालुक्यात 840, कळमनुरीत 518, औंढा 460, वसमत 455 आणि हिंगोलीत 407 प्रकरणांचा समावेश आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रातही 2 हजार 34 प्रकरणे प्रलंबित असून त्यातील 995 प्रकरणे फक्त कलमनुरी तालुक्यात आहेत. युनियन बँक ऑफ इंडियात 748, बँक ऑफ बडोदात 671 आणि बँक ऑफ इंडियात 631 प्रकरणे प्रलंबित आहेत. याशिवाय परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेत 195, सेंट्रल बँक ऑफ इंडियात 193, यूको बँकेत 96, इंडियन बँकेत 53 आणि पंजाब नॅशनल बँकेत 10 प्रकरणे प्रलंबित आहेत. आयसीआयसीआय बँक आणि डीसीसीबी यवतमाळमध्ये सध्या एकही ई-केवायसी प्रलंबित नसल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
ई-केवायसी पूर्ण न झाल्यास शेतकरी सन्मान निधी, विविध पेन्शन योजना तसेच इतर शासकीय अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित बँकांना प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच लाभार्थ्यांनीही आपल्या जवळच्या बँक शाखेत जाऊन आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांकासह ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा निबंधक सुरेखा फुफाटे यांनी केले आहे.
सध्या एसबीआय, महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र या तीन बँकांकडे प्रलंबित कामाचा मोठा भार आहे. त्यामुळे या बँकांमध्ये विशेष मोहीम राबवून ई-केवायसी पूर्ण करण्याचे नियोजन केले जात आहे.