सोनपेठ तालुक्यातील विटा (खु.) येथे बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या धोंडे जेवणाच्या कार्यक्रमाने जिल्ह्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरू केली आहे.
धोंडे जेवणाच्या निमित्ताने महायुतीत गोडवा; विटा (खु.) येथे एकदिलाने विजयाचा निर्धार
परभणी (Legislative Council Election) : परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोनपेठ तालुक्यातील विटा (खु.) येथे बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या धोंडे जेवणाच्या कार्यक्रमाने जिल्ह्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरू केली आहे. महायुतीचे उमेदवार सईद खान यांना थेट आपल्या गावात निमंत्रित करून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेश विटेकर यांनी कार्यकर्त्यांसमोर एकजुटीचा संदेश दिल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
एकेकाळी राजकीय सहकारी म्हणून ओळखले जाणारे आमदार राजेश विटेकर आणि सईद खान यांच्यात विधानसभा निवडणुकीनंतर दुरावा निर्माण झाल्याची चर्चा होती. त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध निवडणुकांमध्ये दोन्ही नेत्यांनी स्वतंत्र भूमिका घेतल्याचे चित्र अनेकदा दिसून आले. त्यामुळे महायुतीचा भाग असूनही जिल्ह्यात दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय अंतर असल्याची चर्चा कायम होती.
याच पार्श्वभूमीवर विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेकडे उमेदवारी गेल्यानंतर विरोधकांकडून विविध राजकीय समीकरणे मांडली जात होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडे १३१ मतांचे संख्याबळ असल्याने आमदार विटेकर यांची भूमिका निर्णायक मानली जात होती. एकूण ४६८ मतदारांपैकी तब्बल ३०७ मतांचे बळ महायुतीकडे असले तरी मतांसोबत मनांची बेरीज होणार का, हा प्रश्न राजकीय चर्चेचा विषय बनला होता.
विटा (खु.) येथील कार्यक्रमाने बदलले वातावरण
आमदार विटेकर यांच्या मूळ गावी आयोजित धोंडे जेवणाच्या कार्यक्रमात सईद खान यांचे झालेले स्वागत, दोन्ही नेत्यांचा एकत्रित वावर आणि कार्यकर्त्यांशी साधलेला संवाद यामुळे राजकीय जाणकार नव्याने समीकरणे मांडताना दिसत आहेत.
यावेळी आमदार राजेश विटेकर यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून महायुतीचे उमेदवार सईद खान यांच्या विजयासाठी एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले. त्यांच्या या भूमिकेमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक संदेश गेल्याचे मानले जात आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग
सध्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीकडून सईद खान, महाविकास आघाडीकडून विवेक नावंदर तर अपक्ष उमेदवार म्हणून सुशील देशमुख मैदानात आहेत. अशा परिस्थितीत शेवटच्या टप्प्यातील प्रत्येक राजकीय हालचाल महत्त्वाची मानली जात असताना विटा (खु.) येथील कार्यक्रमाने महायुतीच्या बाजूने वातावरण निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
राजकारणात कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतात, या उक्तीचा प्रत्यय या कार्यक्रमातून आल्याचे बोलले जात आहे. आमदार राजेश विटेकर आणि गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या राजकीय समन्वयानंतर आता सईद खान यांच्यासोबत दिसलेली ही जवळीक आगामी राजकारणाला नवे वळण देऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
धोंडे जेवणाच्या निमित्ताने झालेली ही भेट महायुतीतील एकजूट अधिक दृढ करणारी आणि विरोधकांची धाकधूक वाढवणारी ठरल्याचे राजकीय निरीक्षकांकडून बोलले जात आहे.
धोंडे जेवण कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती
विटा (खु.) येथे १० जून रोजी आयोजित कार्यक्रमास महायुतीचे उमेदवार सईद खान, संपर्कप्रमुख आनंद जाधव, नगराध्यक्ष डॉ. अंकुश लाड, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड, रोहित देशमुख, जिल्हा परिषद सदस्य मदनराव भोसले-विटेकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अनेक सदस्य उपस्थित होते.