Breaking News
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे दुःखद निधन
  • मुंबई हादरले; बिर्याणी-कलिंगड खाल्यानंतर चौघांचा संशयास्पद मृत्यू!
  • नायानगर परिसरात ‘कलमा’चा दबाव... मुंबई मध्ये पहाटेचा थरारक हल्ला!
  • भाजपमध्ये सामील झाल्यानंतर राघव चड्ढाचा पहिला व्हिडिओ व्हायरल
  • जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला १ मे पासून सुरुवात
  • 'जल संरक्षण' हीच खरी शिवपूजा: आ. श्वेता महाले
  • आरक्षणाचे तुकडे करून जाती-जातींत भांडणे लावण्याचे षडयंत्र: आ. राजकुमार बडोले
  • किंग कोहलीने रचला IPL च्या इतिहासात चौकारांचा नवा विश्वविक्रम
  • अखेर तापत्या उन्हात शिष्यवृत्ती परीक्षा; शिक्षक संघटनेची मागणी नाकारली

होम > आपले शहर > मुंबई

शिवसेना (उ. बा. ठा.) कडून अनपेक्षित निर्णय; दानवे उमेदवार जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ने विधान परिषद निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवार जाहीर करत राजकीय हालचालींना वेग दिला आहे.


शिवसेना उ बा ठा कडून अनपेक्षित निर्णय दानवे उमेदवार जाहीर

Legislative Council Election |

मुंबई (Legislative Council Election) : राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपला अधिकृत उमेदवार जाहीर करत निवडणूक रणधुमाळीला सुरुवात केली आहे. माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी अंबादास दानवे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली असून, ते उद्या (३० एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संमतीनंतरच हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

अंबादास दानवे हे ठाकरे गटातील विश्वासू आणि अनुभवी नेते मानले जातात. त्यांनी ऑगस्ट २०१९ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत विधान परिषदेचे सदस्य म्हणून काम पाहिले असून, ऑगस्ट २०२२ पासून विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारीही त्यांनी समर्थपणे पार पाडली आहे. शिवसेनेत मोठी फूट पडल्याच्या कठीण काळातही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे राहत पक्षनिष्ठा जपली. त्यामुळेच पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवत पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, सुषमा अंधारे आणि राजन विचारेंची नावेही चर्चेत होती; मात्र अंतिम निर्णय दानवे यांच्या बाजूने गेला.

या निवडणुकीत विधान परिषदेच्या एकूण ९ जागांसाठी मतदान होणार आहे. महाविकास आघाडीच्या संख्याबळाचा विचार करता, त्यांना केवळ एक जागा जिंकण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. एका जागेसाठी किमान २९ मतांची गरज असते. सध्याच्या विधानसभा स्थितीनुसार शिवसेना (उबाठा)चे २०, काँग्रेसचे १६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे १० आमदार असल्याने महाविकास आघाडीचे एकत्रित संख्याबळ ४६ इतके होते. त्यामुळे गणित पाहता अंबादास दानवे यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. मात्र, महायुतीकडून अतिरिक्त उमेदवार उभा केल्यास निवडणूक चुरशीची होऊ शकते आणि मतांची फूट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, या संपूर्ण घडामोडीत सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे उद्धव ठाकरे यांनी स्वतः विधान परिषदेवर जाण्याचा पर्याय नाकारला आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या दोन्ही पक्षांकडून उद्धव ठाकरे यांनीच उमेदवारी घ्यावी, अशी मागणी सातत्याने होत होती. काँग्रेसने तर स्पष्टपणे भूमिका मांडत, ठाकरे यांनी उमेदवारी न घेतल्यास ही जागा काँग्रेसला देण्याची मागणी केली होती. मात्र, ठाकरे यांनी हा प्रस्ताव नाकारत पक्षातील विश्वासू सहकारी अंबादास दानवे यांनाच संधी देण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयामुळे महाविकास आघाडीत काही प्रमाणात नाराजीची कुजबुज सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना, “दानवे यांची घोषणा झाली असेल तर आम्ही पाठिंबा देऊ; मात्र अशा निर्णयापूर्वी सहयोगी पक्षांशी चर्चा व्हायला हवी होती,” असे स्पष्ट केले. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनीही या विषयावर पक्षांतर्गत चर्चा करून पुढील रणनीती ठरवली जाईल, असे सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसकडून स्वतंत्र उमेदवार देण्याचाही पर्याय विचाराधीन असून, यासाठी पक्षाचे नेते दिल्लीत वरिष्ठांशी सल्लामसलत करत आहेत.

अंबादास दानवे यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना, “मी महाविकास आघाडीचा एकत्रित उमेदवार आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच इतर सहयोगी पक्षांचा मला पाठिंबा मिळेल, अशी अपेक्षा आहे,” असे सांगितले. उद्धव ठाकरे यांनी सामान्य शिवसैनिकाला संधी देण्याचा घेतलेला निर्णय महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी नमूद करत त्यांचे आभार मानले.

विधान परिषद निवडणूक कार्यक्रम:

उमेदवारी अर्जाचा शेवटचा दिवस : ३० एप्रिल २०२६

अर्जांची छाननी : २ मे २०२६

अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : ४ मे २०२६

मतदान : १२ मे २०२६ (सकाळी ९ ते दुपारी ४)

मतमोजणी : १२ मे २०२६ (सायंकाळी ५ वाजता)

निवडणूक प्रक्रिया पूर्ण : १३ मे २०२६

एकूणच, अंबादास दानवे यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीतील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसची अंतिम भूमिका काय असेल, ते स्वतंत्र उमेदवार देणार का, आणि महायुतीकडून काय रणनीती आखली जाईल—यावर या निवडणुकीचा रंग ठरणार असल्याने राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे.

Related to this topic: