Latur fuel shortage: लातूर जिल्ह्यात इंधनपुरवठा ठप्प झाल्याने काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिला आहे. इंधन कंपन्या व पेट्रोल पंप चालकांवर कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा आरोप.
काँग्रेसच्या शिष्टमंडळाचा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला इशारा
लातूर (Latur fuel shortage) : लातूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत असून, ही टंचाई नैसर्गिक नसून इंधन कंपन्या आणि पेट्रोल पंप चालकांनी संगनमताने निर्माण केलेली कृत्रिम टंचाई आहे, असा खळबळजनक आरोप लातूर जिल्हा काँग्रेसने केला आहे. लातूर जिल्ह्यात तातडीने इंधनपुरवठा सुरळीत करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा काँग्रेसने दिला आहे.
इंधनाच्या गंभीर प्रश्नावर मंगळवारी काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष अभय साळुंके व लातूर शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव यांच्या (Latur fuel shortage) शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला एक निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की सध्या देशामध्ये एकीकडे इंधनाचा तुटवडा नसल्याचे सरकार छातीठोकपणे सांगत आहे, तर दुसरीकडे प्रत्यक्ष जमिनीवर परिस्थिती अत्यंत भयावह आहे. इंधन कंपन्या आणि पेट्रोल पंप चालक जाणीवपूर्वक साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण करत आहेत. ज्याप्रमाणे गॅसचे दर वाढवून जनतेवर बोजा टाकण्यात आला, त्याच धर्तीवर पेट्रोल-डिझेलचे दर वाढवण्याचे हे एक मोठे षडयंत्र असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
लातूर शहरासह (Latur fuel shortage) जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये अनेक पेट्रोल पंपांवर "पेट्रोल-डिझेल शिल्लक नाही" असे खोटे फलक लावले जात आहेत. ज्या मोजक्या पंपांवर इंधन उपलब्ध आहे, तिथे नागरिकांच्या दोन-दोन किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागत आहेत. तासनतास ताटकळत उभे राहिल्यामुळे सामान्य जनता, शेतकरी आणि नोकरदार वर्ग प्रचंड त्रस्त झाला आहे. लोककल्याणकारी राज्याची संकल्पना असलेल्या संविधानाचे नाव घेणारे केंद्र व राज्य सरकार जनतेची ही लूट उघड्या डोळ्यांनी पाहत असल्याचा घणाघातही या प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आला आहे.
नेमका इंधन साठा किती?
जिल्हा प्रशासनाने घोषित करावे की जिल्ह्यात नेमका इंधनाचा साठा किती आहे. जर प्रशासनाच्या मते इंधन तुटवडा नाही, तर खोटे बोर्ड लावणाऱ्या पेट्रोल पंप चालकांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी.सर्व संबंधित तहसीलदारांना आदेश देऊन इंधन साठ्याची तपासणी (स्टॉक ऑडिट) करावी. जनतेची या त्रासातून मुक्तता करण्यासाठी तात्काळ इंधन पुरवठा सुरळीत करावा. अशा मागण्या काँग्रेसने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केलेल्या आहेत
- तर पळो की पळो करून सोडू...
"प्रशासनाने या विषयाचे गांभीर्य ओळखून त्वरित पावले उचलावीत. जर येत्या काही दिवसांत इंधन पुरवठा सुरळीत झाला नाही, तर (Latur fuel shortage) काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाभर रस्त्यावर उतरून 'सळो की पळो' करून सोडण्यात येईल," असा स्पष्ट इशारा अभय साळुंके आणि ॲड. किरण जाधव यांनी दिला आहे. यावेळी काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.