लातूर जिल्हा परिषदेतील पदाधिकारी व सदस्य तसेच पंचायत समिती सदस्यांच्या भत्त्यात वाढ करण्याचा महत्त्वाचा विषय आज होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चेसाठी येणार आहे.
जि. प. परिसरात उभारणार माजी मुख्यमंत्री डॉ. निलंगेकरांचा पूर्णाकृती पुतळा
लातूर : वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा परिषदेतील पदाधिकारी व सदस्य तसेच पंचायत समिती सदस्यांच्या भत्त्यात वाढ करण्याचा महत्त्वाचा विषय आज होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चेसाठी येणार आहे. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा पूर्णाकृती पुतळा लातूर जिल्हा परिषदेच्या परिसरात उभारण्याचा प्रस्तावही सभेपुढे ठेवण्यात येणार आहे. याशिवाय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी नवीन वाहन खरेदीचा विषयही सभेतील महत्त्वाच्या विषयांपैकी एक ठरणार आहे.
लातूर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज, मंगळवार (दि. ७) रोजी दुपारी १२.३० वाजता जिल्हा परिषद अध्यक्षा उषाबाई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यासह या सभेमध्ये एकूण ३५ विषय चर्चेसाठी ठेवण्यात आले आहेत.
या सभेत जिल्हा परिषदेच्या कायदे सल्लागारांचे मानधन व कायदे सल्लागारांची संख्या निश्चित करून जाहिरात देण्यासाठी मान्यता घेण्याचा महत्त्वाचा विषय चर्चेला येणार आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या इमारत भाडे वसुलीचा आढावा आणि जिल्हा परिषद अखत्यारीतील जीर्ण व धोकादायक इमारती पाडण्यासाठी परवानगी मिळण्याबाबतचा प्रस्ताव बांधकाम विभागाने मांडला आहे.
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जिल्हा परिषद अंतर्गत लघुपाटबंधारे, मृद व जलसंधारण विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार नवीन विभागाची निर्मिती व त्यासाठी आवश्यक पदनिर्मितीस मान्यता मिळावी, यासाठीही विषय सभेपुढे प्रस्तावित केला आहे.
लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविण्यावरही होणार चर्चा
महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर सुधारण्याच्या दृष्टीनेही आजच्या सभेत महत्त्वाची चर्चा होणार आहे. महाराष्ट्रात २०२१ च्या अहवालानुसार प्रति १००० मुलांमागे मुलींचे (बाल लिंग गुणोत्तर) प्रमाण ९०६ इतके आहे. तर २०११ च्या जनगणनेनुसार लातूर जिल्ह्यात सर्वसाधारण लिंग गुणोत्तर दर १००० पुरुषांमागे ९२४ महिला इतका आहे. याच अहवालानुसार ० ते ६ वयोगटातील बाल लिंग गुणोत्तर दर १००० मुलांमागे ८८९ मुली इतके नोंदविण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यातील मुलींचे लिंग गुणोत्तर वाढविण्याबाबतच्या आढाव्याचा विषय जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने चर्चेसाठी प्रस्तावित केला आहे. या विषयावर जिल्हा परिषद काही ठोस निर्णय घेते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.