शहराची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कयाधू नदीला आता खऱ्या अर्थाने मोकळा श्वास मिळू लागला आहे.
गाळ, जलपर्णी आणि कचरा हटवून नदीचे रूप पालटणार; जलसंकटावर मात करण्यासाठी प्रशासनाची युद्धपातळीवरील मोहीम
हिंगोली (Kayadhu River) : शहराची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कयाधू नदीला आता खऱ्या अर्थाने मोकळा श्वास मिळू लागला आहे. नदीचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि भविष्यातील जलसंकटावर मात करण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली आहे. मागील काही दिवसांपासून नदीपात्रातील साचलेला गाळ, जलपर्णी आणि कचरा जेसीबीच्या साहाय्याने काढण्याचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. यासोबतच नदीचे खोलीकरण आणि दोन्ही बाजूंनी पिचिंग करण्याचे काम देखील प्राधान्याने करण्यात येत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून कयाधू नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने नदीची पाणी साठवण क्षमता कमालीची घटली होती. पावसाळ्यात नदीला पूर येऊन शेजारील भागात पाणी शिरण्याच्या घटनाही घडत होत्या, तर उन्हाळ्यात मात्र नदी कोरडी पडत असे. ही परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन, नगर परिषद आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त विद्यमाने ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या कामामुळे नदीचे स्वरूप पूर्णपणे पालटत असून नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
सध्या नदीपात्रातील गाळ उपसून काढल्याने नदीची खोली वाढत आहे. त्यामुळे आगामी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा निर्माण होऊन भूजल पातळी वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे. याचा थेट फायदा हिंगोली शहर आणि परिसरातील शेतीला व पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेला होईल.
प्रशासनाच्या या कामात अनेक सामाजिक संस्था आणि स्थानिक नागरिक देखील स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहेत. लोकसहभागातून सुरू असलेल्या या उपक्रमामुळे नदी स्वच्छतेचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचत आहे.
प्रशासनाने हाती घेतलेले हे काम केवळ तात्पुरती मलमपट्टी नसून कयाधू नदीला नवसंजीवनी देणारे ठरणार आहे. नदीचे खोलीकरण, स्वच्छता आणि सुशोभीकरण पूर्ण झाल्यानंतर कयाधू नदीचे रूप अधिक सुंदर आणि प्रवाही होईल.
जलसंवर्धनाच्या दृष्टीने सुरू असलेले हे कौतुकास्पद कार्य भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी एक आदर्श उदाहरण ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या मोहिमेमुळे हिंगोलीकरांच्या जिव्हाळ्याच्या कयाधू नदीला पुन्हा गतवैभव प्राप्त होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.