छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर एक भीषण अपघात घडला असून या दुर्घटनेत ‘शिवनिका ट्रस्ट’चे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर (Jitendra Shelke) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर एक भीषण अपघात घडला असून या दुर्घटनेत ‘शिवनिका ट्रस्ट’चे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ते अशोक खरात यांचे निकटवर्तीय मानले जात होते. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र शेळके हे आपल्या कुटुंबासह कारने संभाजीनगरहून शिर्डीकडे प्रवास करत होते. धोत्रे गावाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरचा अंदाज न आल्याने त्यांच्या कारने थेट पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी जबरदस्त होती की, कारचा समोरचा भाग पूर्णपणे चुराडा झाला आणि वाहन अक्षरशः कंटेनरखाली घुसले.

या अपघातात जितेंद्र शेळके यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान, त्यांच्या पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. अपघातानंतर शेळके यांची पत्नी काही काळ कारमध्ये अडकून पडली होती. तिला बाहेर काढण्यासाठी प्रशासन आणि बचाव पथकाने मोठे प्रयत्न केले.
या दुर्घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

जितेंद्र शेळके हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या अशोक खरात यांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. ‘शिवनिका ट्रस्ट’मध्ये ते उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. तसेच, त्यांच्या मालकीच्या लॉन्समध्येही खरात यांची भागीदारी असल्याची चर्चा होती.
दरम्यान, अशोक खरात यांच्यावर लैंगिक शोषणासह अनेक गंभीर आरोप समोर आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर जितेंद्र शेळके मानसिक तणावाखाली असल्याची माहिती समोर आली आहे.
कोण होते जितेंद्र शेळके?
जितेंद्र शेळके हे ‘शिवनिका ट्रस्ट’चे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. जमीन व्यवहारांमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगितले जाते. खरात प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. हा राजीनामा नाशिक येथील धर्मादाय आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. शिर्डी परिसरात त्यांची ओळख एक व्यावसायिक आणि ट्रस्टशी संबंधित व्यक्ती अशी होती.
या अपघाताने एक कुटुंब उद्ध्वस्त झाले असून, क्षणात आयुष्य कसे बदलते याची ही अत्यंत वेदनादायक जाणीव करून देणारी घटना ठरली आहे.