Collector Rahul Gupta: विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये केंद्रस्तरीय प्रतिनिधींच्या सक्रिय सहभागामुळे मतदार यादी अधिक अचूक, शुद्ध व विश्वासार्ह तयार होण्यास मदत होणार
हिंगोली (Collector Rahul Gupta) : विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये केंद्रस्तरीय प्रतिनिधींच्या सक्रिय सहभागामुळे मतदार यादी अधिक अचूक, शुद्ध व विश्वासार्ह तयार होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी आपापले केंद्रस्तरीय प्रतिनिधी तात्काळ नियुक्त करून अधिक सक्रिय करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गुप्ता यांनी आज येथे केले.
मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण-2026 कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सर्वपक्षीय आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रगती चौंडेकर, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांच्यासह मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रासाठी केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) नियुक्त केल्यास मतदार यादीतील नवीन मतदारांची नोंदणी, मृत अथवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे तसेच आवश्यक दुरुस्तीची प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबवता येईल. त्यामुळे मतदार यादी अधिक पारदर्शक व विश्वासार्ह होण्यास मदत मिळणार आहे. या कार्यक्रमामध्ये राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी जास्तीत जास्त सक्रिय होऊन मतदार यादीतील नाव नोंदणी, मृत, स्थलांतरीत किंवा अपात्र मतदारांची माहिती प्रशासनाला देणे, सर्व मतदारांची नोंदणी झाल्याची खात्री करून घेणे याबाबत यंत्रणेसोबत योग्य समन्वय साधून काम करण्याचे आवाहन (Collector Rahul Gupta) जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी केले.
सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी विशेष सखोल पुनरीक्षण-2026 कार्यक्रमासाठी आपल्या पक्षाचे केंद्रस्तरीय प्रतिनिधी नियुक्त करून त्यांचा या प्रक्रियेत सक्रिय सहभाग सुनिश्चित करावा, असे आवाहन त्यांनी केले. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमातील केंद्रस्तरीय प्रतिनिधींनी मतदान केंद्र क्षेत्रातील पात्र नवीन मतदारांची नोंदणी करण्यास मदत करणे, मृत, स्थलांतरित किंवा अपात्र मतदारांची माहिती प्रशासनाला उपलब्ध करून देणे, मतदार यादीतील त्रुटी, दुरुस्ती व बदलांसंदर्भात सूचना देणे, मतदारांमध्ये जनजागृती करून त्यांना आवश्यक अर्ज व प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करणे, विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या प्रत्येक टप्प्यात निवडणूक यंत्रणेसोबत समन्वय साधून काम करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिका-यांनी केंद्रस्तरीय पदाधिकारी, उपस्थितांना सांगितले.
मतदार यादी अधिक शुद्ध, अचूक आणि सर्वसमावेशक करण्यासाठी राजकीय पक्षांच्या सक्रिय सहकार्याची आवश्यकता असून, या प्रक्रियेत सर्वांनी सकारात्मक सहभाग नोंदवावा, असे आवाहन (Collector Rahul Gupta) जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.