Hingoli Oil Violation Action: हिंगोलीत हॉटेल, ढाबे आणि इतर व्यावसायिकांमध्ये तळण्याच्या तेलाचा पुनरापेक्ष सतत वापर करून फौजदारी कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
हिंगोली (Hingoli Oil Violation Action) : हिंगोली जिल्ह्यात हॉटेल, ढाबे, फास्टफूड सेंटर, भजी-वडा विक्रेते आणि बेकरी व्यावसायिकांकडून तळणासाठी वापरल्या जाणाऱ्या गोडतेलाचा वारंवार पुनर्वापर करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप करत विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिलने अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लाल यांनी जिल्हाधिकारी, हिंगोली यांच्यामार्फत ई-मेलद्वारे दुसरे निवेदन पाठवले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील अनेक खाद्य व्यावसायिक तळणाचे तेल अनेक वेळा वापरत आहेत. वारंवार उच्च तापमानात गरम केलेल्या तेलात विषारी रासायनिक घटक निर्माण होतात. असे तेल कर्करोग, हृदयरोग, यकृत विकार, उच्च रक्तदाब आणि पचनसंस्थेच्या गंभीर आजारांना कारणीभूत ठरते. FSSAI च्या नियमांनुसार Total Polar Compounds चे प्रमाण 25% पेक्षा अधिक झाल्यावर तेल वापरण्यास मनाई आहे. मात्र प्रत्यक्षात या नियमांचे उघड उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
संबंधित अन्न सुरक्षा अधिकारी व भेसळ निरीक्षक या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याने जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे. नियमित तपासणी व नमुना संकलन होत नसल्याने नियमभंग करणाऱ्यांचे मनोबल वाढले आहे. हा प्रकार Food Safety and Standards Act 2006 च्या कलम 26, 27, 56, 59 तसेच FSSAI च्या Reused Cooking Oil संबंधीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणारा आहे.
या (Hingoli Oil Violation Action) पार्श्वभूमीवर कौन्सिलने तातडीने विशेष तपासणी मोहीम राबवून तेलाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवावेत, नियम मोडणाऱ्या व्यावसायिकांचे परवाने रद्द करून फौजदारी कारवाई करावी, निष्काळजी अधिकाऱ्यांची चौकशी करून विभागीय कारवाई करावी, जिल्हास्तरावर जनजागृती मोहीम राबवावी आणि केलेल्या कारवाईचा लेखी अहवाल द्यावा, अशा मागण्या केल्या आहेत.
लाखो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने प्रशासनाने तात्काळ पावले न उचलल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेख नईम यांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती माहिती व कारवाईसाठी जिल्हाधिकारी हिंगोली यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.