रिसोड तालुक्यातील श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, कोयाळी बु. परीक्षा केंद्रातून अथर्व वसंतराव देशमुख याने विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक मिळवला आहे.
रिसोड (HSC Result News) : फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये पार पडलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेचा निकाल आज, २ मे रोजी जाहीर झाला असून रिसोड तालुक्यातील श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, कोयाळी बु. परीक्षा केंद्रातून अथर्व वसंतराव देशमुख याने विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्याला ८८.१७ टक्के गुण प्राप्त झाले आहेत.
या परीक्षा केंद्रामध्ये आसेगाव पेन येथील प्रियदर्शिनी कनिष्ठ महाविद्यालय तसेच श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, कोयाळी बुद्रुक येथील विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. या सर्व विद्यार्थ्यांमधून अथर्व देशमुख याने प्रथम येत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
अथर्व देशमुख हा करडा, तालुका रिसोड येथील रहिवासी असून त्याच्या या यशाबद्दल परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. दोन्ही महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या या यशाचे श्रेय अथर्वने आपल्या गुरुजन वर्गासोबतच आई-वडील आणि आजोबा यांना दिले आहे.