Hingoli accidental death: हिंगोली जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत अपघातात ६७९ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ४४७ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. पोलीस प्रशासनाने विशेष जनजागृती उपक्रम सुरू केला आहे.
सायंकाळी ६ ते ९ ही वेळ ठरतेय ‘डेथ अवर’
हिंगोली (Hingoli accidental death) : जिल्ह्यात रस्ते अपघातांची संख्या चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. पोलिस प्रशासनाने जनजागृतीसाठी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या चार वर्षांत म्हणजेच २०२३ ते एप्रिल २०२६ या कालावधीत जिल्ह्यात एकूण ६७९ निष्पाप नागरिकांचा अपघातात बळी गेला आहे, तर ४४७ जण गंभीर जखमी झाले आहेत.
जिल्हाभरात सन २०२३ मध्ये १६० जणांचा मृत्यू तर ९३ जण गंभीर जखमी झाले. २०२४ मध्ये हा आकडा वाढून १९८ मृत्यू आणि १२३ गंभीर जखमी असा झाला. २०२५ मध्ये परिस्थिती अधिकच गंभीर झाली असून २३३ जणांना प्राण गमवावे लागले, तर १८० जण जखमी झाले. चालू वर्षी एप्रिल २०२६ पर्यंत ८८ जण दगावले असून ५१ जण गंभीर जखमी आहेत.
या आकडेवारीचे विश्लेषण करताना एक धक्कादायक बाब समोर आली आहे. एकूण अपघातांपैकी तब्बल ६० टक्के अपघात दुपारी ३ ते रात्री ९ या वेळेत झाले आहेत.
विशेषतः सायंकाळी ६ ते रात्री ९ ही वेळ सर्वात धोकादायक ठरत असून या तीन तासांतच ३० टक्के अपघात (Hingoli accidental death) घडले आहेत. वेळेनुसार पाहिल्यास, २०२३ ते २०२६ या काळात दुपारी ३ ते ६ दरम्यान १०७ जणांचा मृत्यू झाला, सायं ६ ते रात्री ९ दरम्यान २०५ जण दगावले, तर रात्री ९ ते १२ या वेळेत ९३ जणांचा बळी गेला. या पार्श्वभूमीवर हिंगोली पोलिसांनी १ मार्चपासून 'पोलीस तुमच्या दारी' हा विशेष जनजागृती उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत सायंकाळी ६ ते रात्री ९ या 'डेथ अवर'मध्ये महामार्ग व शहरातील प्रमुख चौकांमध्ये नाकाबंदी करून वाहनचालकांचे समुपदेशन केले जात आहे. हेल्मेटचा वापर, सीट बेल्ट, वेगमर्यादा, मद्यपान करून वाहन न चालवणे याबाबत प्रबोधन केले जात आहे. अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे. आपला एक निष्काळजीपणा संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करू शकतो. विशेषतः सायंकाळच्या वेळेत अधिक सतर्क राहून वाहन चालवावे. चार वर्षांत ६७९ घरे पोरकी करणारे हे आकडे थांबवण्यासाठी पोलिसांसोबतच नागरिकांनीही जबाबदारीने वागावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर निलाभ रोहन यांनी केले आहे.
नाकाबंदी लावून अपघाताचे प्रमाण कमी करण्यावर दिला जाणार भर
अपघातांचे (Hingoli accidental death) हे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन व अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. १ मार्च २०२६ पासून जिल्ह्यातील अपघातप्रवण ठिकाणांवर सायं. ६ ते रात्री ९ या वेळेत काटेकोर नाकाबंदी लावण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन व शहर वाहतूक शाखा दररोज ही कारवाई करत आहेत. नाकाबंदी दरम्यान वाहनचालकांची तपासणी करून हेल्मेट, सीट बेल्ट, वेगमर्यादा, मद्यपान करून वाहन चालवणे यांसारख्या नियमांचे उल्लंघन करणार्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्याचबरोबर शाळा, कॉलेज, चौक व बाजारपेठांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृतीही केली जात आहे.