Mahatma Phule Chitrarath: महात्मा फुले द्विशताब्दी जयंती निमित्त तयार केलेल्या विशेष चित्ररथाचे हिंगोलीत उत्साहात स्वागत. चित्ररथ समता, बंधुता व न्यायाचा प्रसार करत आहे.
महात्मा फुले द्विशताब्दी जयंती निमित्त अखिल भारतीय समता परिषदेचा चित्ररथ महाराष्ट्र दौऱ्यावर
हिंगोली (Mahatma Phule Chitrarath) : क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने तयार केलेल्या विशेष चित्ररथाचे सोमवारी हिंगोली शहरात फटाक्यांच्या आतिषबाजी व पुष्पवृष्टीसह उत्साहात स्वागत करण्यात आले. समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी खासदार समीर भुजबळ व आमदार पंकज भुजबळ यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा चित्ररथ ११ एप्रिल २०२६ ते १० एप्रिल २०२७ या कालावधीत केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत आहे.
या (Mahatma Phule Chitrarath) चित्ररथामध्ये महात्मा जोतीराव फुले यांचा पूर्णाकृती पुतळा आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा अर्धाकृती पुतळा हे मुख्य आकर्षण आहे. त्यासोबतच समतेचे महामेरू राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळेही यात समाविष्ट आहेत. महात्मा फुले यांचे साहित्य, लेखणी, पुस्तकाच्या प्रतिकृती आणि भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेचे प्रतीक असलेल्या भिडे वाड्याची हुबेहूब प्रतिकृती यामुळे चित्ररथाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
सोमवारी रात्रीच्या सुमारास हिंगोलीत दाखल झालेल्या चित्ररथाचे अग्रसेन चौकात नागरिकांनी जोरदार स्वागत केले. त्यानंतर अग्रसेन चौक ते इंदिरा गांधी चौक, जुनी नगरपरिषद मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाने भव्य मिरवणूक काढण्यात आली. मार्गातील महामानवांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी समता परिषद जिल्हाध्यक्ष चंदू लव्हाळे, महिला जिल्हाध्यक्ष वनिताताई गुंजकर, वसंत वाघ, विठ्ठलराव पारीसकर, केशवराज जांबुतकर, बालाजीराव सोनवणे, लिंबाजीराव थोरे, आत्माराम सातव, कैलास सातव, सुरेश ढोरे, भागवत बोधने, प्राचार्य गोरे, ज्ञानोबा गव्हाणे, गणेश बांगर, वामनराव पवार, लक्ष्मणराव ढोले, संजय सातव, जयश्रीताई सातव, ज्योती दिघडे, मीराताई पोपळघट, ऋषिकेश लव्हाळे, अनिकेत लव्हाळे, निलेश गोरे, गजानन बंबरुले, अंकुश कुटे, धामणे, स्वराज वाघ, गोलू, साहिल चौधरी यांच्यासह शेकडो फुले-शाहू-आंबेडकर प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समता, बंधुता, न्याय आणि ज्ञान या मूल्यांचा प्रसार करत हा चित्ररथ गावोगावी पोहोचत आहे. महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्याची आणि विचारांची ओळख नव्या पिढीला करून देणे तसेच सामाजिक एकात्मतेचा संदेश देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. या (Mahatma Phule Chitrarath) उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.