Hingoli wedding ceremony: १४ मे नंतर हिंगोली जिल्ह्यात कोणतेही शुभ मुहूर्त नसल्याने लग्नसमारंभ एक महिन्यासाठी बंद. व्यावसायिक आणि कामगारांची आर्थिक धांदल उडाली आहे.
वधू-वरांसह व्यावसायिकांची पुढारी धांदल
हिंगोली (Hingoli wedding ceremony) : हिंदू पंचांगानुसार येत्या १४ मे २०२६ नंतर विवाहासाठी कोणतेही शुभ मुहूर्त उपलब्ध नसल्याने हिंगोली जिल्ह्यातील लग्न समारंभ तब्बल एक महिन्यासाठी बंद राहणार आहेत. गुरु तारा अस्त होत असल्याने १५ मे ते १५ जून या काळात जिल्ह्यात सनई-चौघड्यांचे सूर ऐकू येणार नाहीत. त्यामुळे वधू-वरांसह मंगल कार्यालये, मंडप व्यावसायिक आणि लग्नसोहळ्याशी संबंधित कामगारांची मोठी धांदल उडाली आहे.
जिल्ह्यातील ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि ज्योतिष अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ मे रोजी सायंकाळी गुरु ग्रह अस्तंगत होणार आहे. विवाह कार्यासाठी गुरु ग्रहाचे बळ अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे गुरु अस्ताच्या काळात लग्न, वास्तुशांतीसारखी मंगल कार्ये करणे वर्ज्य मानले जाते. १५ जून रोजी गुरुचा उदय होईल. मात्र त्यानंतर अवघ्या आठवड्यातच २३ जूनपासून चातुर्मासाला सुरुवात होणार असल्याने जुलै आणि ऑगस्ट महिन्यातही जिल्ह्यात मोजकेच मुहूर्त आहेत. परिणामी १४ मे हा या हंगामातील शेवटचा मोठा मुहूर्त ठरला आहे.
या (Hingoli wedding ceremony) पार्श्वभूमीवर हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ आणि सेनगाव तालुक्यांतील सर्व मंगल कार्यालये, लॉन्स आणि मंडप १२, १३ व १४ मे या तीन दिवसांसाठी पूर्णपणे बुक झाले आहेत. एकाच दिवशी अनेक ठिकाणी दोन ते तीन शिफ्टमध्ये लग्नसमारंभ पार पडणार आहेत. हिंगोली शहरातील प्रमुख मंगल कार्यालयांच्या संचालकांनी सांगितले की, मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच बुकिंगसाठी मोठी झुंबड उडाली होती. अचानक मागणी वाढल्याने डेकोरेशन, केटरिंग, बँडपथक, घोडागाडी आणि फोटोग्राफीचे दर ३० ते ४० टक्क्यांनी वाढले आहेत. अनेक कुटुंबांना हवी ती तारीख व हॉल न मिळाल्याने त्यांनी तडजोड केली आहे.
लग्नसराईतील (Hingoli wedding ceremony) या एक महिन्याच्या खंडाचा सर्वाधिक फटका हंगामी कामगारांना बसणार आहे. हिंगोली कृषिप्रधान जिल्हा असल्याने येथे लग्न सराईच्या काळात हजारो मजुरांना मंडप उभारणी, वाढपी, स्वयंपाक, लाईट आणि डेकोरेशनच्या कामात रोजगार मिळतो. एक महिना काम बंद राहिल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. फुलविक्रेते, रथ सजावट करणारे आणि स्थानिक वाद्यवृंदांनाही आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.
दरम्यान, १४ मे नंतर लग्नाचे नियोजन केलेल्या कुटुंबांनी आता थेट जुलैनंतर किंवा दिवाळीनंतर नोव्हेंबर २०२६ मध्ये मुहूर्त पाहण्यास सुरुवात केली आहे. काहींनी तातडीने १४ मे पूर्वीच सोप्या पद्धतीने विवाह उरकण्याचा निर्णय घेतला आहे. एकंदरीत, पंचांगातील बदलामुळे हिंगोली जिल्ह्यातील लग्नसराईला महिनाभरासाठी पूर्णविराम मिळाला असून, पुढील मुहूर्तासाठी सर्वांनाच प्रतीक्षा करावी लागणार आहे.