Hingoli Helmet Enforcement: हिंगोली शहरात दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्तीची मोहीम सुरू आहे. नियम पाळणाऱ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले जात आहे, तर नियम न पाळणाऱ्यांवर १००० रुपये दंड लागत आहे.
हिंगोली (Hingoli Helmet Enforcement) : हिंगोली शहरात मागील चार दिवसांपासून दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्तीची विशेष मोहीम राबवली जात आहे. शहर वाहतूक शाखा आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकांकडून शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि गर्दीच्या ठिकाणी वाहनांची तपासणी केली जात आहे. या मोहिमेदरम्यान हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकांना 1000 रुपये दंड आकारला जात आहे, तर नियमांचे पालन करणाऱ्यांचे कौतुकही केले जात आहे.
शुक्रवार, 25 एप्रिल रोजी वाहतूक पोलिसांनी एक वेगळा उपक्रम राबवला. शहरातील गांधी चौक, अकोला नाका, कळमनुरी रोड परिसरात तपासणी करताना ज्या दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातले होते, त्यांना पोलिसांनी थांबवून गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. "तुमच्या सुरक्षेसाठी तुम्ही घेतलेली ही काळजी कौतुकास्पद आहे. तुमच्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळेल," असे सांगत पोलिसांनी नागरिकांचे आभार मानले.
याबाबत माहिती देताना हिंगोली शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शरद मरे म्हणाले, "गेल्या चार दिवसांपासून आम्ही (Hingoli Helmet Enforcement) सक्तीची कारवाई करत आहोत. केवळ दंड आकारणे हा आमचा उद्देश नाही. लोकांनी स्वयंस्फूर्तीने हेल्मेट वापरावे, स्वतःचा जीव वाचवावा यासाठी आम्ही जनजागृती करत आहोत. हेल्मेट न घालणाऱ्यांना आधी समज देऊन नियमांचे महत्त्व पटवून सांगितले जात आहे. तरीही नियम मोडल्यास मोटार वाहन कायद्यानुसार 1000 रुपये दंड आकारला जात आहे."
हिंगोली शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मरे यांनी आकडेवारी देत सांगितले की, रस्ते अपघातात डोक्याला मार लागल्याने होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण सर्वाधिक आहे. हेल्मेट घातल्याने अपघातात डोक्याला गंभीर दुखापत होण्याचा धोका 70% पर्यंत कमी होतो. "तुमचे कुटुंब तुमची वाट पाहत असते. फक्त 2 मिनिटांचा वेळ वाचवण्यासाठी संपूर्ण आयुष्य धोक्यात घालू नका," असे आवाहन त्यांनी केले.
हिंगोली शहर वाहतूक विभागाच्या पथकाने इंदिरा गांधी चौक, बसस्थानक परिसर, जिल्हा परिषद चौक, महात्मा गांधी चौक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, महावीर स्तंभ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महाराजा अग्रसेन चौक, महात्मा ज्योतिबा फुले चौक, बिरसा मुंडा चौक, गणपती चौक येथे पत्रके वाटूनही जनजागृती केली. दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोघांनीही हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. कमी दर्जाचे किंवा ISI मार्क नसलेले हेल्मेट वापरू नये, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.
शहरातील अनेक नागरिकांनी पोलिसांच्या या ‘शिस्त आणि शाबासकी’ या दोन्ही भूमिकेचे स्वागत केले आहे. दुचाकीस्वार मुकुंद केंद्रेकर म्हणाले, "दंडाबरोबर कौतुकही केले जात असल्याने सकारात्मक संदेश जातो. आता हेल्मेट घालणे सवयीचा भाग बनवू."
वाहतूक शाखेने नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी, स्वतःच्या जीवासाठी हेल्मेटचा वापर करावा आणि वाहतुकीचे सर्व नियम पाळावेत. अपघात टाळता येतात, फक्त थोडीशी काळजी घेण्याची गरज आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर रोहन निलाभ अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शरद मरे यांच्यासहपोलीस उपनिरीक्षक रावसाहेब दत्तराव घुमनर गजानन केशवराव राठोड, संभाजी मालबाराव मोरे, शिवाजी विठ्ठलराव पारसकर, संदिप देवराव खरबळ, विलास मदनराव सिनगारे, राजकुमार गंगाराम सुर्वे, संजय पुंजाजी चव्हाण, सुखदेव विक्रम जाधव, शशिकांत गोविंदराव भिसे, संदिप परसराम जाधव, गजानन साहेबराव दांडेकर, कपील संजय जाधव, संतोष हरीभाऊ घुगे, चंद्रशेखर वसंतराव देशमुख, नंदकिशोर उमाकांत महाजन, शे. ईमरान शे.कदीर,
श्रीकांत अशोक सरोदे, विद्या रमेश भुजबळे, मिरा माणिक सोनपावले, शिल्पा चंद्रकांत फटाले हे कर्मचारी यशस्वी पणे मोहीम राबवत आहेत.
मोहीम पुढेही सुरू राहणार- पोलीस निरीक्षक शरद मरे
ही (Hingoli Helmet Enforcement) हेल्मेट सक्तीची मोहीम केवळ चार दिवसांपुरती मर्यादित नसून पुढेही अशीच सुरू राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक शरद मरे यांनी सांगितले. "नागरिकांनी दंडाच्या भीतीने नव्हे, तर स्वतःच्या सुरक्षेसाठी हेल्मेट घालावे. नियम पाळणाऱ्या सजग नागरिकांचा आम्ही असाच सन्मान करत राहू," अशी ग्वाही त्यांनी दिली.