Vighnaharta Chintamani Ganapati: हिंगोलीतील गड्डेपिर गल्लीत श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या मंदिरात अंगारक चतुर्थीच्या पावन मुहूर्तावर लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली
हिंगोली (Vighnaharta Chintamani Ganapati) : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हिंगोली शहरातील गड्डेपिर गल्ली भागातील श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी मंगळवार, 5 मे रोजी अंगारक चतुर्थीच्या पावन मुहूर्तावर हजारो भाविकांनी गर्दी केली. सकाळपासूनच मंदिर परिसर 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. पहाटेच्या मंगल आरतीपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागण्यास सुरुवात झाली आणि दिवसभर हा ओघ कायम राहिला.
मंगळवारी आलेली अंगारक चतुर्थी (Vighnaharta Chintamani Ganapati) विशेष मानली जाते. त्यामुळे हिंगोलीसह परभणी, नांदेड, वाशिम जिल्ह्यांतून आणि ग्रामीण भागातूनही मोठ्या संख्येने भाविक बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आले होते. सकाळच्या सुमारास उन्हाची तीव्रता अधिक जाणवत होती. मात्र दुपारनंतर अचानक हवामान बदलले आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. हवामानातील या बदलाचा दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या श्रद्धेवर कोणताही परिणाम झाला नाही. उन्ह असो वा पाऊस, भाविकांचा उत्साह कायम होता आणि बाप्पाच्या दर्शनाची ओढ त्यांना रांगेत उभे राहण्यास भाग पाडत होती.
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिर संस्थानने (Vighnaharta Chintamani Ganapati) आधीच चोख नियोजन केले होते. भाविकांना सुलभ आणि शिस्तबद्ध दर्शन घेता यावे यासाठी मंदिर संस्थांनने खबरदारी घेतली. मंदिर परिसरात स्वयंसेवक आणि पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. उन्हापासून बचावासाठी मंडपाची व्यवस्था तसेच पिण्याच्या पाण्याची सोयही करण्यात आली होती. पावसामुळे गैरसोय होऊ नये यासाठीही संस्थानने तातडीने उपाययोजना केल्या.
सायंकाळी महाआरतीच्या वेळी मंदिर परिसरातील भक्तिमय वातावरण शिगेला पोहोचले होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तांच्या जयघोषात संपूर्ण परिसर गणेशमय झाला. रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांची रीघ सुरूच होती. अंगारक चतुर्थीच्या दिवशी विघ्नहर्त्याचे दर्शन घेतल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे. याच श्रद्धेपोटी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनीच कोणत्याही नैसर्गिक अडचणीची तमा न बाळगता बाप्पाचे दर्शन घेतले आणि कृतार्थ झाले. एकंदरीतच, प्रतिकूल हवामानावर मात करत भाविकांनी दाखवलेल्या भक्तीमुळे यंदाची अंगारक चतुर्थी हिंगोलीकरांसाठी अविस्मरणीय ठरली.