Marriage Registration Office: हिंगोलीतील निबंधक कार्यालय बेमुदत संपामुळे बंद आणि नवदाम्पत्य चंद्रशेखर आणि तेजलच्या विवाह नोंदणीच्या योजना विस्कळित झाल्या. नागरिकांच्या तातडीच्या कामांचे हाल सुरू आहेत.
हिंगोली (Marriage Registration Office) : आयुष्यभर एकमेकांची साथ देण्याचे स्वप्न उराशी बाळगून चंद्रशेखर कांबळे आणि तेजल खंदारे हे जोडपे २२ एप्रिल रोजी विवाह नोंदणीसाठी हिंगोलीतील निबंधक कार्यालयात पोहोचले. मात्र ऐन मुहूर्तावर कार्यालयाच्या दाराला कुलूप पाहून त्यांचा आनंद हिरावला गेला.
मागील महिन्यात सेनगाव तालुक्यातील केंद्रा बु. येथील चंद्रशेखर लक्ष्मण कांबळे आणि तेजल गोवर्धन खंदारे यांनी विवाह नोंदणीसाठी अर्ज दाखल केला होता. नियमानुसार त्यांना २३ एप्रिल रोजीची तारीख देण्यात आली होती. ठरलेल्या तारखेनुसार दोघेही नटून थटून कार्यालयात आले. नवरी तेजलने हातावर मेहंदी रेखाटली होती, गळ्यात फुलांचा हार होता. नवरा चंद्रशेखरनेही मुंडावळ बांधून नव्या कपड्यांसह विवाह नोंदणीचा सोहळा साजरा करण्याची तयारी केली होती. नातेवाईक, मित्रमंडळीही साक्षीदार म्हणून उपस्थित होते. मात्र कार्यालयात पोहोचताच त्यांच्यासमोर बंद दरवाजा आणि कुलूप दिसले.
चौकशी केली असता, मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे निबंध कार्यालय बंद असल्याचे समजले. दिलेल्या तारखेला कार्यालयच बंद असल्याने आता विवाह नोंदणी कशी करायची, असा मोठा प्रश्न दोघांसमोर उभा राहिला आहे. 'महिनाभर आधी अर्ज करून तारीख घेतली. आजचा दिवस आमच्यासाठी खास होता. सर्व तयारी केली, नातेवाईकांना बोलावले. पण इथे आल्यावर कुलूप दिसले. आता पुन्हा कधी तारीख मिळेल, सुट्टी मिळेल का, याची चिंता वाटते,' असे भावनिक होत चंद्रशेखर यांनी सांगितले. तेजलदेखील हिरमुसली होती. 'मेहंदीचा रंग हातावर ताजा असताना कायद्याने एकत्र येण्याचे स्वप्न रखडले,' अशी खंत तिने व्यक्त केली.
कर्मचाऱ्यांच्या संपामुळे केवळ हे एकच जोडपे नव्हे तर अनेक नागरिकांची महत्त्वाची कामे खोळंबली आहेत. (Marriage Registration Office) विवाह नोंदणी, दस्त नोंदणी, प्रतिज्ञापत्र अशा तातडीच्या सेवांसाठी नागरिकांचे हाल होत आहेत. दरम्यान, दिलेल्या तारखेला कार्यालय बंद असल्याने अर्जदारांची गैरसोय होत आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन पर्यायी व्यवस्था करावी किंवा संपकाळात विशेष कक्ष सुरू करून विवाह नोंदणीसारखी तातडीची कामे मार्गी लावावीत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. नियोजित मुहूर्त चुकल्याने अनेकांचे धार्मिक आणि सामाजिक नियोजन विस्कळीत होण्याची भीती आहे. प्रशासन या नवदाम्पत्याच्या व्यथेकडे लक्ष देऊन तातडीने मार्ग काढेल, अशी अपेक्षा चंद्रशेखर आणि तेजलसह सर्वच अर्जदार व्यक्त करत आहेत.