Sambhaji Maharaj Jayanti: हिंगोलीतील छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना निमंत्रण देण्यात आले आहे. या जयंतीला आकर्षक रोषणाई आणि भगव्या झेंड्यांची शोभा वाढवणार.
हिंगोली (Sambhaji Maharaj Jayanti) : अखिल भारतीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनायकराव भिसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हिंगोली येथे दरवर्षी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि शाही थाटात साजरी केली जाते. यंदाही 14 मे रोजी होणाऱ्या जयंती सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली असून, या सोहळ्यासाठी मराठा आरक्षणाचे नेते तथा मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.
यासाठी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना जयंती सोहळ्याचे अधिकृत निमंत्रण दिले. यावेळी पप्पू उर्फ संभाजी सुरेश चव्हाण, ऍडव्होकेट अमोल जाधव, ऍडव्होकेट मुंजा मगर, बालाजी वानखेडे, गजानन सोळंके, सरपंच गोपाल मस्के यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. भगवा उपरणा घालून मनोज जरांगे पाटील यांनी अत्यंत आदराने हे निमंत्रण स्वीकारले.
विनायकराव भिसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोलीतील संभाजी महाराज जयंती हा संपूर्ण मराठवाड्यातील एक मानाचा आणि भव्यदिव्य सोहळा म्हणून ओळखला जातो. या दिवशी हिंगोली शहर भगव्या पताका, ढोलताशांच्या गजरात आणि (Sambhaji Maharaj Jayanti) छत्रपतींच्या जयघोषाने दुमदुमून जाते. छावा संघटनेकडून दरवर्षी या जयंतीनिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी मनोज जरांगे पाटील यांची उपस्थिती लाभल्यास सोहळ्याला वेगळीच उंची प्राप्त होणार आहे. मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारे जरांगे पाटील आणि शंभूराजांच्या विचारांचा वारसा जपणारी छावा संघटना, हे समीकरण जयंती सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
निमंत्रण स्वीकारताना मनोज जरांगे पाटील यांनीही आयोजकांचे आभार मानले. 14 मे रोजी होणाऱ्या या सोहळ्यासाठी हिंगोलीसह संपूर्ण जिल्ह्यातून हजारो शिवप्रेमी व छावा सैनिक उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. सध्या शहरात जयंतीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, चौकाचौकात कमानी, भगवे झेंडे आणि आकर्षक रोषणाई करण्यात येत आहे.