उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा बारावीचा निकाल २ मे रोजी दुपारी जाहिर झाला आहे.
सलग तिसर्या वर्षी जिल्ह्याचा आलेख घसरता; जिल्ह्याचा निकाल ८२.८६ टक्के
हिंगोली (Hingoli Result) : उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा बारावीचा निकाल २ मे रोजी दुपारी जाहिर झाला आहे. छत्रपती संभाजी नगर विभागात जिल्ह्याचा निकाल सतत तिसर्या वर्षीही घसरल्याने शिक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. सन २०२४ मध्ये जिल्ह्यचा निकाल ९१.८८ टक्के होता. त्यानंतर सन २०२५ मध्ये यामध्ये ३.३४ टक्क्यांनी घट होऊन ८८.५४ टक्के लागला. तर तिसर्या वर्षी यंदाचा निकाल मात्र कमालीचा घसरला असून ८२.८६ टक्के निकाल लागला आहे. उतरत्या क्रमांकाने जिल्हा पाचव्या म्हणजे विभागात शेवटच्या क्रमांकावर आला आहे.
बारावीच्या परिक्षांचा निकाल २ मे रोजी दुपारी जाहिर झाला. या निकालात हिंगोली जिल्ह्याचा टक्का घसरला असून विभागात पाचव्या क्रमांकावर आला आहे. विशेष म्हणजे गतवर्षी पेक्षा ५.९८ टक्क्यांनी निकाल कमी लागला आहे.बारावी शालांत परिक्षा मराठवाडा विभागाचा एकुण निकाल ८८.६८ टक्के लागला आहे. यामध्ये छत्रपती संभाजी नगर जिल्हा ९०.८२ टक्के उत्तीर्णतेसह प्रथम क्रमांकावर आहे. दुसर्या क्रमांकावर बीड जिल्ह्याचा ९०.१४ टक्के निकाल लागला आहे. तिसर्या क्रमांकावर परभणी जिल्हा असून उत्तीर्णतेची टक्केवारी ८७.६९ एवढी आहे. तर चौथ्या क्रमांकावर जालना जिल्हा असून उत्तीर्णतेची टक्केवारी ८६.१७ एवढी आहे. शेवटी पाचव्या क्रमांकावर हिंगोली जिल्हा असून या जिल्ह्याची टक्केवारी ८२.८६ टक्के आहे. सन २०२४ मध्ये हिंगोली जिल्ह्याचा निकाल ९१.८८ टक्के लागला होता. यामध्ये ३.३४ टक्क्यांनी घसरण होऊन गतवर्षी ८८.५४ टक्के निकाल लागला होता. तर यावर्षी जिल्हा गतवर्षीपेक्षा ५.९८ टक्क्यांनी घसरला असून निकाल ८२.८६ टक्के लागला आहे.
हिंगोली जिल्ह्याचा बारावी निकालात आढावा घेतला असून फेब्रुवारी २०२० मध्ये जिल्ह्याचा निकाल ८८.५४ टक्के लागला होता. यावेळी हिंगोली जिल्हा विभागात तिसर्या क्रमांकावर राहिला होता. फेब्रुवारी २०२१ मध्ये जिल्ह्याचा निकाल ९९.८१ टक्के लागला होता. यावेळी जिल्हा विभागात दुसर्या क्रमांकावर राहिला. फेब्रुवारी २०२२ मध्ये ९३.५२ टक्के निकाल लागला. जिल्हा चौथ्या क्रमांकावर राहिला. फेब्रुवारी २०२३ मध्ये ८६.३० टक्के निकाल लागला. यावेळी निकालात मोठी घसरण झाली. परंतु फेब्रुवारी २०२४ मध्ये निकालाच्या टक्केवारीत वाढ होऊन ९१.८८ टक्के निकाल जाहिर झाला होता परंतु ही वाढ कायम राहिली नसून गतवर्षी जिल्हा चौथ्या स्थानावर राहिला होता. तर यावर्षी जिल्हा शेवटच्या स्थानावर पोहचला आहे.
विज्ञान शाखेचा सर्वाधिक निकाल!
जिल्ह्याचा शाखानिकाल बारावीचा निकाल पाहिला असता सर्वाधिक निकाल विज्ञान शाखेचा लागला आहे. या शाखेत ७ हजार ५४४ विद्यार्थ्यांनी बारावीची परिक्षा दिली असता ७ हजार ६ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९२.८६ टक्के लागला आहे. त्या खालोखाल कला शाखेचा विचार केला असता जिल्ह्यातून ५ हजार ९९३ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली असता ४ हजार १०२ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ७१.०५ टक्के लागला आहे. तर त्या पाठोपाठ वाणिज्य शाखेसाठी केवळ ७०० विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली असता ४९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ७१.७९ टक्के लागला आहे.
कळमनुरी तालुका यंदाही पिछाडीवरच!
जिल्ह्यात कळमनुरी तालुक्याचा शिक्षणात तिसरा क्रमांक यंदाही कायम राहिला आहे. विशेष म्हणजे प्रथम स्थानावर असलेल्या हिंगोली तालुक्याचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८८.२६ असताना कळमनुरी मात्र ७८.८६ टक्के घेऊन जिल्ह्यात पाचव्या क्रमांकावर ९.४ टक्क्यांनी मागासलेले आहे. दुसर्या क्रमांकावर औंढा नागनाथ तालुका असून ८८.०८ टक्के निकाल लागला आहे. तिसर्या क्रमांकावर सेनगाव तालुका असून तालुक्याचा निकाल ८१.५३ टक्के आहे. तर चौथ्या क्रमांकावर वसमत तालुक्याचा निकाल ८०.३८ टक्के आहे.