Hingoli Police Special Mission: हिंगोली पोलीस महिला व बालकांच्या अत्याचार रोखण्यासाठी विशेष मोहिम चालवत आहे. महिला मदत कक्ष, 'दामिनी पथक' 'निर्भया पथक' यांचा वापर करून हिंसाचार, बालविवाह, सायबर गुन्हे
महिला सपोनि प्रेमलता जगताप (गोमासे) यांची माहिती
हिंगोली (Hingoli Police Special Mission) : महिला व बालकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हिंगोली पोलीस सदैव तत्पर आहेत, हा विश्वास जिल्ह्यातील नागरिकांमध्ये अधिक दृढ होत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी तसेच त्यांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी पोलीस दलाने विशेष मोहीम हाती घेतली असल्याची माहिती भरोसा सेल (महिला तक्रार निवारण) कक्षाच्या महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रेमलता जगताप (गोमासे) यांनी दिली आहे.
महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र महिला मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षामार्फत तक्रारींची त्वरित दखल घेऊन त्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे. विशेषतः कौटुंबिक हिंसाचार, छेडछाड, बालविवाह तसेच सायबर गुन्ह्यांसंदर्भातील प्रकरणांमध्ये जलद तपास करून पीडितांना न्याय मिळवून देण्यावर भर दिला जात आहे.शाळा, महाविद्यालये व ग्रामीण भागात जाऊन पोलीस दलाकडून जनजागृती कार्यक्रम राबवले जात आहेत.
'दामिनी पथक' व 'निर्भया पथक' (Hingoli Police Special Mission) यांच्या माध्यमातून गर्दीच्या ठिकाणी, बस स्थानक, बाजारपेठेत नियमित गस्त घातली जात असून महिलांच्या सुरक्षेची खात्री केली जात आहे. तसेच बालकांसाठी 'चाईल्ड हेल्पलाईन १०९८' व महिलांसाठी '१०९१' या हेल्पलाईन क्रमांकांवर २४ तास मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे.हिंगोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला व बालकांनी कोणत्याही प्रकारच्या त्रासाला बळी न पडता थेट पोलीस ठाण्याशी किंवा हेल्पलाईनशी संपर्क साधावा. त्यांची ओळख गोपनीय ठेवून तात्काळ मदत केली जाईल, अशी ग्वाही प्रशासनाने दिली आहे.
संवेदनशील प्रकरणांमध्ये समुपदेशनाचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.'महिला व बालकांचे प्रश्न सोडवणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे. जिल्ह्यातील एकही महिला किंवा बालक असुरक्षित राहणार नाही यासाठी हिंगोली पोलीस दल कटिबद्ध आहे', असा विश्वास वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी व्यक्त केला. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून नागरिकांकडून पोलीस दलाच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.