Hingoli Local Crime Branch: जिल्ह्यात जबरी चोरी करणाऱ्या टोळीला पकडण्याच्या नावाखाली स्थानिक गुन्हे शाखेने मोठा गाजावाजा केला असला तरी प्रत्यक्षात हाती लागलेला आहे केवळ एक आरोपी
म्हणे...स्थानिक गुन्हे शाखेची भरीव कामगिरी
हिंगोली (Hingoli Local Crime Branch) : जिल्ह्यात जबरी चोरी करणाऱ्या टोळीला पकडण्याच्या नावाखाली स्थानिक गुन्हे शाखेने मोठा गाजावाजा केला असला तरी प्रत्यक्षात हाती लागलेला आहे केवळ एक आरोपी. 15 पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकाने केलेल्या या कारवाईत टोळीतील दोन साथीदार मात्र सहजपणे पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. त्यामुळे "भरीव कामगिरी" म्हणत पोलिसांनी स्वतःचीच पाठ थोपटून घेण्याचा प्रकार नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
हिंगोलीचे पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शना खाली 4 ऑगस्ट रोजी पो.स्टे. कुरुंदा हद्दीत पेट्रोलिंग करणाऱ्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली ज्यामध्ये कुरुंदा ते वसमत रस्त्यावरील वेअर हाऊस समोर चाकूचा धाक दाखवून मोटार सायकल स्वारांकडून जबरी चोरी करणारी टोळी तेथे आहे. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या 15 कर्मचाऱ्यांनी छापा टाकून कुरुंदा येथील दुर्गादास गजानन घोंगडे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून जबरी चोरीतील 9 लाख 20 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल जप्त करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
मात्र याच (Hingoli Local Crime Branch) छाप्यादरम्यान घोंगडेसोबत असलेले इतर दोन साथीदार पोलिसांच्या घेर्यातून निसटले. तब्बल 15 पोलीस कर्मचारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि आधीपासूनची माहिती असतानाही दोघांना पळून जाणे हे पोलिसांच्या नियोजनातील मोठे अपयश मानले जात आहे. गुन्हेगारांना पकडण्याऐवजी त्यांना पळण्याची संधी मिळालीच कशी, असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. कुरुंदा पोलीस ठाणे हद्दीतील जबरी चोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली आणि दोघे फरार आहेत असे सांगून पोलिसांनी हात झटकले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून हिंगोली जिल्ह्यात रस्त्यावर होणाऱ्या जबरी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यावर आळा घालण्यासाठी विशेष पथके नेमली आहेत असे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात एका छोट्या टोळीला पकडण्यासाठीही पूर्ण पथकाला अपयश आले आणि दोन आरोपी मोकाट राहिले, ही बाब पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे करते. स्थानिक गुन्हे शाखेने कामगिरी मोठी दाखवण्याचा प्रयत्न केला जात असला तरी जमिनीवर वास्तव वेगळेच आहे.
पोलिसांनी जरी एका आरोपीला पकडले असले तरी फरार असलेले दोघे पुन्हा गुन्हे करण्याच्या शक्यतेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे ही "भरीव कामगिरी" म्हणण्याऐवजी अपूर्ण कारवाई म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल. जोपर्यंत टोळीतील सर्व आरोपी जेरबंद होत नाहीत तोपर्यंत पोलिसांनी केलेल्या या कारवाईला यश म्हणता येणार नाही.