Hingoli Sub Registrar Office: हिंगोलीतील दुय्यम निबंधक कार्यालयात इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या अभावामुळे महत्वाचे कामकाज ठप्प झाले आहे. नागरिक आणि दस्तलेखक संतप्त.
हिंगोली (Hingoli Sub Registrar Office) : शहरातील सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग-2 कार्यालयात गेल्या आठवडाभरापासून इंटरनेट कनेक्टिव्हिटी पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे दस्तनोंदणी, मालमत्ता व्यवहार, करारपत्रे व इतर महसुली कामकाज पूर्णपणे कोलमडले आहे. शेकडो नागरिकांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार रखडले असून ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना वारंवार हेलपाटे मारूनही रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास वाढला आहे.
कार्यालयात (Hingoli Sub Registrar Office) दररोज मोठ्या प्रमाणावर दस्तनोंदणीसाठी गर्दी होत असते. मात्र सर्व्हर डाऊन असल्याने एकही दस्त नोंदविला जात नाही. बँकेचे कर्जप्रकरण, मुदत संपणारे करार तसेच इतर तातडीचे व्यवहार खोळंबल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. वकील व दस्तलेखकांचे कामही ठप्प पडल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असूनही प्रशासनाकडून अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही.
या गंभीर परिस्थितीकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. कनेक्टिव्हिटीचा प्रश्न हा काही नवीन नाही. यापूर्वीही अनेकदा तांत्रिक बिघाडामुळे कामकाज विस्कळीत झाले होते. तरीही कायमस्वरूपी तोडगा काढला जात नाही. पर्यायी व्यवस्था नसल्याने संपूर्ण यंत्रणा ठप्प होते आणि त्याचा फटका सर्वसामान्यांना बसतो.
नागरिकांनी व विविध संघटनांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी केली आहे. जोपर्यंत कनेक्टिव्हिटी सुरळीत होत नाही तोपर्यंत नागरिकांची गैरसोय कायम राहणार आहे. प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे हिंगोलीतील दुय्यम निबंधक कार्यालयातील कारभाराचा पुरता बोजवारा उडाला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
नागरिकांमध्ये संताप:
गेल्या आठवडा भरापासून दस्त नोंदणी ठप्प असल्याने शेकडो नागरिकांचे व्यवहार रखडले. ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असून वेळ आणि पैशांचा अपव्यय होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी: कनेक्टिव्हिटीचा प्रश्न वारंवार उद्भवत असून शासनाचा महसूल बुडत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी तातडीने लक्ष घालून कायम स्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी नागरिक व दस्तलेखक संघटनेकडून होत आहे.