Gram Panchayat Reservation: हिंगोली तालुक्यातील ९५ ग्रामपंचायतींच्या २०२४, २०२५ व २०२६ मध्ये संपणाऱ्या निवडणुकांसाठी ५०% आरक्षण सोडत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
निवडणुक प्रक्रियेतील महत्वाचा टप्पा असलेल्या वार्डनिहाय सदस्य आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष
हिंगोली (Gram Panchayat Reservation) : तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगातर्फे आरक्षण सोडतीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ५० टक्क्यांच्या मर्यादेच्या व ओबीसी आरक्षणाच्या निर्देशानुसार ही प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानुसार हिंगोली तालुक्यातील ९५ ग्रामपंचायतीच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केला.
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक (Gram Panchayat Reservation) सन २०२४ व सन २०२५ मध्ये मुदत संपलेल्या व २०२६ मध्ये मुदत संपणार्या बिगर अंशतः अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतच्या सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. हिंगोली तालुक्यातील ९५ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे सध्या या सर्व ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित राहिल्याने ग्रामपंचायत निवडणुका देखील पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
दरम्यान, ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण तसेच (Gram Panchayat Reservation) ग्रामपंचायतींची वॉर्ड रचना यापूर्वीच अंतिम करण्यात आली आहे. त्यामुळे आता निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असलेल्या वॉर्डनिहाय सदस्य आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर कोणत्या गटासाठी कोणती जागा राखीव राहणार हे स्पष्ट होणार असून निवडणुकीतील समीकरणांवर त्याचा थेट परिणाम होणार आहे. आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमा-नुसार ८ जून रोजी विशेष ग्रामसभेची सूचना (आरक्षणाची सोडत काढण्या करिता), १२ जून २०२६ रोजी विशेष ग्रामसभा बोलावून तहसीलदारांनी प्राधीकृत केलेल्या अधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत ठेवण्यात आली असून १७ जून रोजी प्रभाग निहाय आरक्षण प्रारूप अधिसुचनेला (नमुना ब) जिल्हाधिकार्यांची मान्यता देणे, १९ जून २०२६ रोजी प्रारूप आरक्षण प्रसिद्ध करण्यात येणार आहे, त्यानंतर त्याच दिवशी प्रभाग निहाय आरक्षण निश्चितीबाबत १९ ते २५ जून २०२६ दरम्यान कालावधी देण्यात आला आहे. तर ३ जुलै २०२६ रोजी उपविभागीय अधिकार्यांनी अभिप्राय देणे, ८ जुलै रोजी उपविभागीय अधिकार्यांचा अभिप्राय विचारात घेऊन अंतीम अधिसुचनेस (नमुना अ) जिल्हाधिकार्यांनी मान्यता देणे, १० जुलै रोजी जिल्हाधिकार्यांनी मान्य केलेल्या अंतीम प्रभाग रचनेला (नमुना अ) व्यापक प्रसिद्धी देणे हा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
९५ ग्रामपंचायतचे आरक्षण सोडत
आंबाळा, अंभेरी, आमला, अंधारवाडी, बळसोंड, बासंबा, बेलुरा, भांडेगाव, भिंगी, भिरडा, भोगाव, बोडखी, बोंडाळा, बोराळा, बोराळवाडी, बोरी शिकारी, बोरजा, चिंचाळा, चिंचोली, दाटेगाव, देऊळगाव रामा, देवठाणा, डिग्रस कर्हाळे, डिग्रसवाणी, दुर्ग धामणी, दुर्ग सावंगी, गाडीबोरी, बिलोली, हिंगणी, हिरडी, हिवरा बेल, इंचा, इसापूर, जयपूरवाडी, जांभरूण आंध, जांभरूण तांडा, जामठी खु, जोडतळा, कडती, कळमकोंडा बु., कलगाव, कणका, कानडखेडा बु., कानडखेडा खु., कनेरगाव नाका, करंजाळा, कारवाडी, केसापूर, खडकद बु., खांबाळा, खानापूर चित्ता, खंडाळा, खरबी, खेड, खेर्डा, लासीना, लिंबाळा प्र.वा, लिंबी, लोहगाव, लोहरा, माळधामणी, माळ हिवरा, माळसेलु, नांदुरा, नर्सी नामदेव, नवलगव्हाण, पहेणी, पळसोना, पांगरी, पारडा, पारोळा, पातोंडा, पेडगाव, फाळेगाव, पिंपळदरी तर्फे बासंबा, पिंपळखुटा, पिंपरखेड, राहोली बु. राजुरा, सागद, समगा, सरकळी, साटंबा, सवड, सावरगाव बंगला, सावरखेडा, सिरसम बु., टाकळी तर्फे नांदापूर, उमरखोजा, उमरा, वैजापूर, वर्हाडी, वाझोळा, वरूड गवळी, येळी या ग्रामपंचायतीची निवडणुक घेण्यात येणार आहे.