हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासकीय कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन आज सलग चौथ्या दिवशीही सुरूच आहे.
हिंगोली (Hingoli Employee Strike) : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासकीय कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन आज सलग चौथ्या दिवशीही सुरूच आहे. सुधारित पेन्शनसह एकूण १८ मागण्यांवर शासनासोबत झालेल्या चर्चेत तोडगा न निघाल्याने कर्मचाऱ्यांनी संप अधिक तीव्र केला आहे.
या संपामुळे गेल्या चार दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व शासकीय विभागांचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. याचा थेट फटका सामान्य नागरिकांना बसत असून, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, ७/१२ उतारे यांसारखी अत्यावश्यक कामे थांबली आहेत. विद्यार्थी आणि शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. नांदेड रोडवरील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सेतू केंद्र तसेच तहसील कार्यालयातील दैनंदिन कामकाज बंद असल्याने नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. विविध विभागांतील फाईल्सचा निपटारा न झाल्याने विकासकामे आणि अनेक प्रकरणे प्रलंबित राहिली आहेत.
आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेणे, रिक्त पदे तातडीने भरणे, तसेच आशा आणि अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचारी दर्जा देणे यांसह एकूण १८ मागण्यांचा समावेश आहे. हा राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या कार्यालयासमोरच कर्मचारी ठिय्या आंदोलन करत आहेत. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत बेमुदत संप मागे घेणार नाही, असा पवित्रा कर्मचारी संघटनांनी घेतला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस नागरिकांची गैरसोय कायम राहण्याची शक्यता आहे.
या बेमुदत आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष दिलीप कदम यांच्यासह आम्रपाली चोरमारे, जी.ए. कंठे, आर. ए. चव्हाण, ए.व्ही. पवार, जी.एस. दुभळकर, डी.एस. निमजे, ए.व्ही. पाथरकर, ए.एम. भुसारे, विजय घ्यार, पी.एस. गोटे, व्ही.डी. पांडे, एस.बी. नाईकनवरे, हरी पिसाळ, एम.बी. डाखोरे, पी.व्ही. काळबांडे, खैरनार, एस.एन. कदम आदी सहभागी झाले आहेत.