Hingoli Crime Branch: हिंगोलीतील पोलिस शाखेला गुन्हेमारू कामगिरी करण्याचा आरोप करत असून, नागरिकांचा प्रश्न होतो की कायमच गंभीर गुन्ह्यांवर तपासा केला जातो.
गंभीर गुन्हे मात्र अद्यापही अनिर्णित
हिंगोली (Hingoli Crime Branch) : जिल्ह्यातील गुन्हेगारीवर वचक ठेवणारी यंत्रणा म्हणून स्थानिक गुन्हे शाखेकडे पाहिले जाते. मात्र सध्याची या शाखेची कामगिरी म्हणावी तशी समाधानकारक नसल्याची चर्चा जिल्ह्यात जोर धरू लागली आहे. किरकोळ चोरी, भुरट्या गुन्ह्यांतील आरोपी पकडून प्रसिद्धी मिळवण्यातच गुन्हे शाखा अधिक व्यग्र असल्याचा आरोप होत आहे.
जिल्ह्यात एकूण १३ पोलीस ठाणे आहेत. गेल्या काही महिन्यांत बहुतांश गंभीर गुन्हे हे स्थानिक पोलीस ठाण्यांच्या तपासातून उघड झाले आहेत. खुनाचे प्रयत्न, दरोडा, घरफोडी, वाहन चोरीसारखे गंभीर गुन्हे अद्यापही उलगडले नाहीत. काही गुन्ह्यांतील मुख्य आरोपी गेल्या अनेक महिन्यांपासून फरार आहेत. अशा स्थितीत स्वतःच्या कामगिरीबाबत मोठमोठ्या गोष्टी सांगणार्या स्थानिक गुन्हे शाखेच्या यंत्रणेला हे फरार आरोपी नेमके का सापडत नाहीत, असा सवाल सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत. विशेष म्हणजे गुन्हे शाखेच्या या ढिसाळ कामगिरीवरून वरिष्ठ अधिकारीही समाधानी नसल्याचे बोलले जात आहे. केवळ आकडेवारी वाढवण्यासाठी किरकोळ गुन्हे हाती घेऊन स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रकार सुरू असल्याची नाराजी वरिष्ठ पातळीवर असल्याचे समजते.
दरम्यान येत्या दोन-तीन दिवसांवर १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आहे. या निमित्ताने जिल्ह्याचे पालकमंत्री सह विविध मान्यवर मंडळी हिंगोलीत दाखल होणार आहेत. अशा महत्त्वाच्या दिवशी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मोठी कामगिरी दाखविण्याचा दबाव स्थानिक गुन्हे शाखेवर आहे. याच पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेकडून ‘मारून मुटकून’ एखादी मोठी कामगिरी दाखविण्याचे प्रयत्न सुरू असल्याची कुजबूज पोलीस वर्तुळात आहे. यासाठी पथकाने आपल्या खबर्यांमार्फत माहिती गोळा करण्याच्या हालचालीही वाढवल्या आहेत.
मात्र केवळ सण, उत्सव किंवा मान्यवरांच्या दौर्यापुरतीच कामगिरी दाखवण्यापेक्षा वर्षभर सातत्याने गंभीर गुन्ह्यांचा छडा लावणे हीच खरी जबाबदारी असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. फरार आरोपींचा शोध, जिल्ह्यात वाढणारी वाहन चोरी, आणि अंमली पदार्थांची तस्करी याकडे गुन्हे शाखेने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. १५ ऑगस्टपूर्वी गुन्हे शाखा खरोखरच ठोस कामगिरी करणार की केवळ देखावा करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. जिल्ह्याच्या सुरक्षेचा आणि नागरिकांच्या विश्वासाचा प्रश्न असल्याने स्थानिक गुन्हे शाखेने आता केवळ आकड्यांसाठी नव्हे तर गुणवत्तेसाठी काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.