Hingoli BJP Convention: 'प्रबुध्द संमेलन' हिंगोलीत आयोजित करण्यात आले असून भारतीय जनता पक्षाच्या पुढारकांना स्वागत केले गेले. येथील इतर विचारवंतांनी प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न न केला.
हिंगोली (Hingoli BJP Convention) : भारतीय जनता पक्षाच्या केंद्रात असलेल्या १२ वर्षापासूनच्या सत्ताकाळात झालेल्या तथाकथित विकासाचा उहापोह करण्यासाठी हिंगोलीत आयोजिलेल्या बैठकीला केवळ पक्षातील प्रबुध्दांनीच हजेरी लावली.जिल्ह्यातील इतर विचारवंतांनी या संमेलनाकडे तद्दन पाठ फिरवली.
केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सत्ताकाळाला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात झालेल्या विकासाबद्दल चर्चा करण्यासाठी जिल्ह्यातील प्रबुध्द वर्गातील विचारवंतांना पाचारण करून त्यांच्याशी संवाद साधण्याचा कार्यक्रम पक्षाच्या केंद्रीय समितीने देशभर सुरू केला आहे. याच शृंखलेत सोमवारी हिंगोलीत ‘प्रबुध्द संमेलनाचे ’ आयोजन करण्यात आले होते. या संमेलनास जालना येथील लोकसभेत पराभूत झालेले माजी मंत्री रावसाहेब दानवे यांना पाचारण करण्यात आले होते. या संमेलनात कलम ३७०, राम मंदिर, तिहेरी तलाख, आयुष्यमान भारत, उज्वला योजना, शेतकरी सन्मान निधी अशा विविध विषयांवर दुतर्फा संवाद अपेक्षित होता.
परंतु या संमेलनास भारतीय जनता पक्षातील या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आमदार तान्हाजीराव मुटकूळे, आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव, जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे, संयोजक फुलाजीराव शिंदे,माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर,महिला जिल्हाध्यक्ष उज्वलाताई तांभाळे, के.के.शिंदे, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष शिवाजीराव मुटकूळे, सुभाष लदनिया, युवानेते शशिकांत वडकुते, सुरजितसिंह ठाकुर, जिल्हा सरचिटणिस उमेश नागरे, सुनिताताई मुळे, सुनिल देवडा, अॅड. श्रीधर घुगे, अॅड.सुनिल भुक्तर, अॅड. राजेश गोटे, डॉ.विठ्ठल रोडगे, जिल्हा प्रवक्ता विलास गोरे, शहराध्यक्ष रजनीश पूरोहीत, शंकर बोरुडे, माणिक लोडे, संतोष टेकाळे, हमीद प्यारेवाले, कैलाश शहाणे, संदीप वाकडे आदी पक्षातील प्रबुध्द मंडळीच उपस्थित होती. भारतीय जनता पक्षाशी किंवा राजकारणाशी संबंधित नसलेल्या प्रबुध्द वर्गातील विचारवंतांची संख्या एका हाताच्या बोटावर मोजण्या एवढीच होती. हिंगोली शहर व जिल्ह्याच्या उद्योग , व्यवसाय व सेवा क्षेत्रात शेकडो त्रुटी असताना या विषयावर मात्र या संमेलनात काही एक चर्चा झाली नाही.
प्रबुध्दांच्या संमेलनात ‘आवयामी - स्थापयामी’ चीच चर्चा
पक्षातील निष्ठावंतांना डावलून नव्याने आलेल्यांना लाभाची पदे मिळत असल्याची बातमी
दै.देशोन्नतीने सोमवारच्या अंकात प्रकाशित केली होती. आजच्या संमेलनात ‘मोदी सरकार’ च्या कामा ऐवजी या बातमीचीच चर्चा होत असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे या बैठकीकडेही पक्षाच्या जुन्या निष्ठावंतांनी पाठ फिरविल्याचे प्रक्रर्षाने जाणवली.