वादळी वाऱ्यासह गारपिटीने कांदा बीजोत्पादनाचे नुकसान !
सेनगाव (Hailstorm Damage) : तालुक्यात सोमवारी (३० मार्च) रात्रीच्या सुमारास निसर्गाचे रौद्ररूप पाहायला मिळाले. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीने तालुक्यातील कापडसिंगी, नानसी, डोंगरगाव, सालेगाव आणि उटी पूर्ण या शिवाराला झोडपून काढले. या नैसर्गिक आपत्तीमुळे हाता तोंडाशी आलेला कांदा बीजोत्पादनाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हावालदील झाला आहे.
दिवसभर कडक ऊन पडलेले असताना, रात्रीच्या वेळी अचानक वातावरणात बदल झाला. सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारांचा वर्षाव झाल्याने शेतातील उभी पिके भुईसपाट झाली आहेत. कापडसिंगी आणि परिसरातील गावांमध्ये वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, पिकांचे संरक्षण करणारी यंत्रणा कोलमडली.
कापडसिंगी, नानसी, डोंगरगाव परिसरातील बळीराजा पुन्हा संकटात
सेनगाव तालुक्यातील या पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर कांदा बीजोत्पादनाचे (कांदा डेंगळे) पीक घेतले जाते. सध्या हे पीक काढणीच्या किंवा परिपक्वतेच्या अवस्थेत होते. मात्र, गारांच्या मारामुळे कांद्याची फुले गळून पडली असून डेंगळे वाकली आहेत. यामुळे बियाणांच्या गुणवत्तेवर आणि उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. कांदा बीजोत्पादनासाठी शेतकऱ्यांनी एकरी लाखो रुपयांचा खर्च केला होता, जो आता डोळ्यादेखत मातीमोल झाला आहे.
"रात्रीच्या वादळाने आमचं सर्वस्व हिरावून नेलं आहे. कांदा बीजोत्पादनावर संपूर्ण वर्षाची भिस्त होती, पण आता डोळ्यासमोर फक्त उद्ध्वस्त झालेली शेतं दिसत आहेत," अशी आर्त हाक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिली आहे. कापडसिंगी, नानसी आणि डोंगरगाव येथील शेतकऱ्यांनी शासनाने विशेष पथकामार्फत पंचनामे करावेत आणि तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.
केवळ कांदाच नव्हे, तर बागायती पिके आणि फळबागांनाही या वादळाचा मोठा फटका बसला आहे. सालेगाव आणि उटी पूर्ण परिसरात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. महसूल विभागाने तातडीने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज व्यक्त होत आहे.