मराठवाड्यातील परिस्थितीही चिंताजनक असून लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये येत्या चार दिवसांत, म्हणजेच २४ मार्चपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
(Hailstorm Damage) विदर्भातील अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसांत अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून रब्बी हंगामातील उत्पन्नाचे स्वप्न अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहे. विशेषतः बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल २०१ गावांमध्ये सुमारे ३ हजार ८०२ हेक्टर क्षेत्रावरील पिके या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला असून याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे.
दरम्यान, मराठवाड्यातील परिस्थितीही चिंताजनक असून लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये येत्या चार दिवसांत, म्हणजेच २४ मार्चपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच नांदेड, हिंगोली, परभणी आणि बीड जिल्ह्यांमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभाग यांच्या अंदाजानुसार, मराठवाडा विभागात गेल्या तीन दिवसांपासून मध्यम ते जोरदार पाऊस होत असून त्यामुळे फळबागांसह रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून शासनाकडून तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी जोर धरत आहे.