गंगाखेड शहरातील नागरिकांना दिल्या जाणाऱ्या जनसेवेच्या कार्यात कोणत्याही प्रकारची हयगय, दिरंगाई, निष्काळजीपणा व बेशिस्तपणा यापुढे खपवून घेतला जाणार नाही.
नगर परिषदेची प्रतिमा उंचवण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने काम करावे; अधिकारी-कर्मचाऱ्यांना कडक सूचना
परभणी (Gangakhed Municipal Council) : गंगाखेड शहरातील नागरिकांना दिल्या जाणाऱ्या जनसेवेच्या कार्यात कोणत्याही प्रकारची हयगय, दिरंगाई, निष्काळजीपणा व बेशिस्तपणा यापुढे खपवून घेतला जाणार नाही, अशा कठोर सूचना गंगाखेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. उर्मिलाताई मधुसूदन केंद्रे यांनी मुख्याधिकारी तसेच सर्व विभागप्रमुखांना दिल्या आहेत.
नगर परिषदेच्या कामकाजात मागील काही वर्षांपासून काही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून निष्काळजीपणा, बेशिस्तपणा तसेच दिरंगाई होत असल्याची बाब गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा प्रकारांमुळे नगर परिषदेची प्रतिमा मलिन होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यालयीन वेळेचे पालन न करणे, नागरिकांची कामे विनाकारण प्रलंबित ठेवणे, हालचाल नोंदवही व इतर आवश्यक अभिलेख अद्यावत न ठेवणे तसेच कर्तव्य पालनात हलगर्जीपणा करणे असे प्रकार वारंवार निदर्शनास येत असल्याने बुधवार, १ जुलैपासून कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचा बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सोमवार, २९ जून रोजी मुख्याधिकारी व सर्व विभागप्रमुखांना दिलेल्या निर्देशांमध्ये शहरातील नागरिकांना वेळेत आणि गुणवत्तापूर्ण सेवा पुरविणे ही प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याची जबाबदारी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. कामाच्या जबाबदारीत कसूर करणाऱ्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्याची गय केली जाणार नसल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
नगराध्यक्षा केंद्रे यांनी दिलेल्या सूचनांनुसार, १ जुलैपासून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेपूर्वी उपस्थित राहून नियमित हजेरी नोंदवावी. विनापरवानगी अनुपस्थित राहणे किंवा कार्यालयाबाहेर जाणे टाळावे. कार्यालयीन कामानिमित्त बाहेर जाताना आणि परत आल्यानंतर हालचाल नोंदवहीमध्ये वेळेसह संपूर्ण नोंद करणे बंधनकारक राहील.
तसेच नागरिकांची कामे विनाकारण प्रलंबित ठेवू नयेत. प्राप्त अर्ज, तक्रारी, प्रस्ताव आदी प्रकरणांचा विहित कालावधीत निपटारा करावा. प्रत्येक विभागप्रमुखाने आपल्या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती, कामकाज आणि शिस्तीवर नियंत्रण ठेवावे. कार्यालयीन अभिलेख, नोंदवही, फाईल्स व इतर कागदपत्रे अद्यावत ठेवावीत. कोणतीही नोंद अपूर्ण अथवा प्रलंबित ठेवू नये. वरिष्ठांनी दिलेल्या सूचना व आदेशांचे तात्काळ पालन करावे आणि कामात टाळाटाळ करू नये, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले असून, यापुढे कर्तव्यात हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार शिस्तभंगाची तसेच प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
शहरवासीयांना वेळेत, दर्जेदार आणि पारदर्शक सेवा देणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत हा आदेश अंतिम सूचना समजून त्याचे काटेकोर पालन करावे आणि नगर परिषदेची प्रतिमा उंचवावी, असे आवाहन नगराध्यक्षा सौ. उर्मिलाताई मधुसूदन केंद्रे यांनी केले आहे.