गडचिरोली जिल्ह्यात अहेरीहून सिरोंच्याकडे निघालेल्या एसटी बसचे मागील चाक अचानक निखळल्याची धक्कादायक घटना घडली.
अहेरी-सिरोंचा मार्गावरील मेळारामजवळ थरारक घटना; चाक तब्बल १०० फूट दूर शेतात जाऊन पडले
गडचिरोली जिल्ह्यात अहेरीहून सिरोंच्याकडे निघालेल्या एसटी बसचे मागील चाक अचानक निखळल्याची धक्कादायक घटना घडली. मेळाराम गावाजवळ धावत्या बसचे चाक सुटून सुमारे १०० फूट अंतरावर जाऊन पडले. त्यावेळी बसमध्ये २८ प्रवासी होते. चालकाने प्रसंगावधान राखत बसवर नियंत्रण मिळवून ती सुरक्षितपणे थांबवल्याने मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने या प्रकारात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही.
एमएच-४० ए.क्यू.-६१२५ क्रमांकाची ही बस अहेरी आगारातून सिरोंच्याच्या दिशेने जात होती. मेळाराम गावाच्या परिसरात पोहोचल्यानंतर अचानक बसच्या मागील बाजूचे चाक वेगळे झाले. चाक रस्त्यापासून दूर जाऊन शेतात पडल्याने बसमधील प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
चाक निखळल्याचे लक्षात येताच चालकाने तातडीने परिस्थिती हाताळली. बस सुरक्षितरीत्या थांबवण्यात आल्याने २८ प्रवाशांचा जीव वाचला. घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झालेली नाही.
दरम्यान, बस रस्त्यावर धावण्यापूर्वी तिची 'प्रि-ट्रिप इन्स्पेक्शन' करण्यात आली होती. तसेच नट-बोल्टचीही तपासणी करण्यात आल्याची माहिती अहेरी आगाराचे डेपो मॅनेजर खाडिलकर यांनी दिली आहे.
सध्या संबंधित बस सिरोंचा आगारात आहे. ती अहेरी आगारात परतल्यानंतर तिची सविस्तर तांत्रिक तपासणी केली जाणार आहे. या तपासणीनंतर चाक नेमके कोणत्या कारणामुळे निखळले, हे स्पष्ट होईल, असे खाडिलकर यांनी सांगितले.
मात्र, आगारातून नियमित तपासणी करून बस मार्गावर पाठवली जात असल्याचा दावा करण्यात येत असतानाच धावत्या बसचे चाक निखळल्याने एसटी महामंडळाच्या देखभाल व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. चाकाच्या नट-बोल्टची तपासणी योग्य पद्धतीने झाली होती का किंवा 'व्हील असेंब्ली'मध्ये काही तांत्रिक समस्या निर्माण झाली होती का, याचा तपास होणे महत्त्वाचे ठरणार आहे.