महाराष्ट्र राज्य स्वतंत्र ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे राज्याध्यक्ष देवानंद फुलझेले यांचा सवाल
गडचिरोली (Fund Misuse) : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी आज २० मार्च रोजी परीपत्रक काढुन ग्रामपंचायत अधिकारी यांच्या मासिक वेतनातून राजकीय, धार्मिक तसेच संघटनात्मक वर्गणी तसेच देणगी कपात न करण्याबाबत परिपत्रक काढले आहे. मात्र मागील पाच वर्षात युनियन वर्गणी म्हणुन गोळा केलेले १ कोटी ३५ लाख ३० हजार रूपये कुठे गेले असा प्रश्न महाराष्ट्र राज्य स्वतंत्र ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे राज्याध्यक्ष देवानंद फुलझेले यांनी पत्रकातून उपस्थित केला असल्याने जिल्हा परिषद प्रशासनात खळबळ निर्माण झाली आहे.
फुलझेले यांनी पत्रकात म्हटले आहे की, वर्गणीची रक्कम ग्रामसेवकांच्या वेतनातुन कपात करून ग्रामसेवक संघटनेच्या खात्यावर वर्ग करण्यात आली. लेखा संहिता कलम ७१ नुसार वेतनातुन ११ स्वरूपाची वजावट करण्याची तरतुद आहे. मात्र कर्मचारी संघटनेची कोणत्याच स्वरूपाची वर्गणी तथा लढा निधी वेतनातुन कपात करता येत नाही. तरी नियमाला बगल देत गडचिरोली जिल्ह्यात पंचायत स्तरावरून ग्रामसेवकांच्या वेतनातुन संघटना निधी म्हणुन ५०० ते १००० रूपये वसुल करून ते संघटनेच्या खात्यावर वर्ग केलेल्या गेले आहे. यात दर महिण्याला गडचिरोली तालुक्यातुन प्रतेकी १ हजार प्रमाणे २६ कर्मचार्यांचे २६०००, चामेर्शी तालुक्यातील ४१ कर्मचार्यांचे १००० प्रमाणे ४१००० हजार, कुरखेडा तालुक्यातील ३३ कर्मचार्यांचे ५०० प्रमाणे १६५००, एटापल्ली तालुक्यातील २४ कर्मचार्यांचे १००० प्रमाणे २४०००, धानोरा तालुक्यातील ४५ कर्मचार्यांचे १००० प्रमाणे ४५०००, कोरची तालुक्यातील २० कर्मचार्यांचे २००००, मुुलचेरा तालुक्यातील ११ कर्मचार्यांचे ५५००, भामरागड तालुक्यातील १८ कर्मचार्यांचे ९०००, अहेरी तालुक्यातील २० कर्मचार्यांचे १००००, आरमोरी तालुक्यातील २३ कर्मचार्यांचे ११५००, देसाईगंज तालुक्यातील १४ कर्मचार्यांचे ७०००, सिरोंचा तालुक्यातील २० कर्मचार्यांचे १०००० हजार असे एकुण २९५ कर्मचार्यांचे दर महिण्याला २ लाख २५ हजार ५०० संघटनेच्या खात्यावर पंचायत समिती स्तरावरून देय केल्या जात आहे . या अंतर्गत मागिल पाच वर्षात १ कोटी ३५ लाख ३० हजार रूपये कर्मचार्यांच्या वेतनातुन कपात केल्या गेले .मात्र याचा लेखा जोखा शासनास सादर केला गेला नाही. मग हा निधी कुठे गेला असा प्रश्न फुलझेले यांनी उपस्थित केला आहे.