काही तास धुमाकूळ घालणाऱ्या आणि नागरिकांमध्ये घबराट निर्माण करणाऱ्या त्या पिसाळलेल्या कोल्ह्याला अखेर वन विभागाने शिताफीने पकडले आहे.
नागरिकांचा सुटकेचा निश्वास
हिंगोली (Fox Capture) : शहरात ३१ मार्च मंगळवार रोजी सकाळी काही तास धुमाकूळ घालणाऱ्या आणि नागरिकांमध्ये घबराट निर्माण करणाऱ्या त्या पिसाळलेल्या कोल्ह्याला अखेर वन विभागाने शिताफीने पकडले आहे. या कारवाईमुळे जलेश्वर तलाव आणि अंबिका टॉकीज परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला असून निर्माण झालेली दहशत आता निवळली आहे.
हिंगोली शहरातील अंबिका टॉकीज ते जलेश्वर तलाव कट्टा या मुख्य रस्त्यावर एका पिसाळलेल्या कोल्ह्याचा वावर वाढला होता. हा कोल्हा अत्यंत आक्रमक झाला असून तो रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर धावून जात होता. सकाळी आणि रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या लोकांसाठी हा कोल्हा मोठा धोका बनला होता.
पिसाळलेल्या कोल्ह्याने केवळ माणसांनाच नाही, तर रस्त्यावरील एका गायीवरही हल्ला करून तिचा लचका तोडला होता. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. लहान मुले आणि महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, परिणामी नागरिकांनी या रस्त्यावरून ये-जा करणे टाळले होते.
नागरिकांनी या प्रकाराची माहिती प्रशासनाला दिल्यानंतर, वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोणतीही दिरंगाई न करता तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. कोल्हा नेमका कुठे दबा धरून बसला आहे, याचा कर्मचाऱ्यांनी कसून शोध घेतला. काही वेळातच या हिंस्र कोल्ह्याला शोधून काढून त्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यात आले.
यासाठी विभागीय वन अधिकारी डॉ. राजेंद्र नाळे, वन परीक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार, वनपाल शिवराम कृष्ण चव्हाण, वनरक्षक सारंग शिंदे वनमजूर संग्राम भालेराव वाहचालक अशोक राऊत आणि सिद्धीकी यांनी पुढाकार घेतला.
वन विभागाच्या या जलद कारवाईमुळे परिसरात पसरलेली दहशत संपुष्टात आली आहे. कोल्हा पकडल्याचे समजताच जलेश्वर तलाव परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त करत वन विभागाच्या टीमचे आभार मानले आहेत. आता या परिसरातील जनजीवन पुन्हा पूर्वपदावर आले असून नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
दरम्यान, कोल्हा पकडला असला, तरी वन्यप्राण्यांच्या वावराबाबत नागरिकांनी सतर्क राहावे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.