अहमदाबाद शहरात अन्नातील भेसळ आणि दूषित अन्नाच्या घटना वारंवार समोर येत असताना, अशाच एका धक्कादायक प्रकरणात दोन लहान मुलींचा मृत्यू झाला असून त्यांच्या आई-वडिलांची प्रकृती गंभीर आहे.
अहमदाबाद (Food Poisoning) : अहमदाबाद शहरात अन्नातील भेसळ आणि दूषित अन्नाच्या घटना वारंवार समोर येत असताना, अशाच एका धक्कादायक प्रकरणात दोन लहान मुलींचा मृत्यू झाला असून त्यांच्या आई-वडिलांची प्रकृती गंभीर आहे.
ही घटना चांदखेड़ा परिसरात उघडकीस आली. संबंधित कुटुंबाने बाजारातून रेडीमेड डोश्याचे पीठ (खीरू) खरेदी करून त्यापासून डोसा तयार करून खाल्ला होता. त्यानंतर कुटुंबातील चारही सदस्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि अन्न विषबाधेची लक्षणे दिसू लागली.
या घटनेत सुमारे अडीच ते तीन महिन्यांची राहा आणि चार वर्षांची मिश्री या दोन मुलींचा मृत्यू झाला. तर आई भावना प्रजापती आणि वडील विमल प्रजापती यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, इतक्या लहान बाळाला घन आहार दिला जात नाही, त्यामुळे त्या बाळाच्या मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. आईला विषबाधा झाल्यानंतर तिने स्तनपान केल्यामुळे बाळावर परिणाम झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
विमल प्रजापती यांचे वडील गौरीशंकर प्रजापती यांनी सांगितले की, “माझ्या मुलाने आयओसी रोडवरील घनश्याम डेअरीमधून रात्री सुमारे ८ वाजता खीरू आणले. त्याने त्याच रात्री डोसा बनवून खाल्ले. दुसऱ्या दिवशी त्याला उलट्या होऊ लागल्या आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याच्या पत्नीनेही तेच पीठ वापरून डोसे बनवले आणि मुलीला दिले. त्यानंतर त्यांनाही त्रास सुरू झाला.”
सध्या विमल आणि भावना प्रजापती यांच्यावर केडी रुग्णालयात उपचार सुरू असून, या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
चांदखेड़ा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, अन्नाचे नमुने जप्त करण्यात आले आहेत. डोश्याच्या पिठात भेसळ किंवा दूषितपणा होता का, याची तपासणी केली जात आहे. मृत मुलीचे शवविच्छेदन करण्यात आले असून, फॉरेन्सिक सायन्स लॅब (FSL)ची मदत घेण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक जे. के. मकवाना यांनी सांगितले की, कुटुंबाने १ एप्रिल रोजी पीठ खरेदी करून त्याच दिवशी व दुसऱ्या दिवशी त्याचा वापर केला. त्यानंतर सर्वांना उलट्या, अशक्तपणा अशी लक्षणे दिसू लागली. सुरुवातीला त्यांनी साधे उपचार घेतले, मात्र प्रकृती खालावल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
४ एप्रिल रोजी अडीच महिन्यांच्या मुलीचा घरीच मृत्यू झाला. त्या वेळी पोलिसांना माहिती देण्यात आली नव्हती आणि अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर ५ एप्रिल रोजी मोठी मुलगी चक्कर येऊन कोसळली आणि रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, फॉरेन्सिक लॅब आणि अन्न व औषध विभागाच्या पथकांनी तपास सुरू केला असून, घरातून आणि संबंधित डेअरीमधून नमुने गोळा करण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
घनश्याम डेअरीचे मालक केतन पटेल यांनी सांगितले की, “आम्ही दररोज १०० ते १२५ किलो खीरू विकतो. त्याच बॅचमधील पीठ इतर ग्राहकांनीही घेतले होते, मात्र कोणतीही तक्रार आलेली नाही.”
त्यांचे भाऊ विपुलभाई यांनीही सांगितले की, “सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्याच ड्रममधून अनेक ग्राहकांनी पीठ घेतले होते. आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला असता कुणालाही त्रास झाल्याचे समोर आले नाही.”
अहमदाबाद महानगरपालिकेच्या अन्न विभागाचे अधिकारी डॉ. तेजस शाह यांनी सांगितले की, या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे.
सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, शवविच्छेदन आणि प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.