वाढत्या इंधन दरांमुळे शेतीचा खर्च प्रचंड वाढत असून शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
समस्या न सुटल्यास ‘पेरा बंद’ आंदोलनाचा इशारा
चिखली (FARMERS PROTEST) : वाढत्या इंधन दरांमुळे शेतीचा खर्च प्रचंड वाढत असून शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतमालापासून बायोडिझेल निर्मितीस परवानगी द्यावी, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन द्यावे तसेच शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घ्यावेत, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते देविदास किसनराव कणखर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे १८ मे २०२६ रोजी केली आहे. हे निवेदन तहसीलदार कार्यालय, चिखली मार्फत पाठविण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, सरकारकडून शेतकऱ्यांना यांत्रिकी पद्धतीने शेती करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. मात्र रासायनिक शेतीमुळे जमिनीची सुपीकता कमी होत असून उत्पादन खर्चात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे नैसर्गिक शेतीला चालना देणे अत्यावश्यक झाले आहे. रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय व नैसर्गिक पद्धतीचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन जमिनीची गुणवत्ता टिकून राहील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


देशात पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे शेती मशागतीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ट्रॅक्टर, पंप व इतर शेती उपकरणांसाठी लागणाऱ्या इंधनाचा मोठा आर्थिक भार शेतकऱ्यांवर पडत आहे. त्यामुळे शेतमालापासून तयार होणाऱ्या बायोडिझेलला शासनाने परवानगी दिल्यास शेतकरी आत्मनिर्भर होतील तसेच देशालाही पर्यायी इंधनाचा मोठा स्रोत उपलब्ध होईल, असे निवेदनात म्हटले आहे.
शेतकरी संघटनेने निवेदनातून शेती मशागतीसाठी ट्रॅक्टरला आवश्यकतेनुसार डिझेल उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करणे, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना राबविणे तसेच रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
यावेळी शेतकऱ्यांनी “शेतकऱ्यांनी नाही केला पेरा तर काय खाल धतूरा...” अशा घोषणा देत शासनाचे लक्ष वेधले. तसेच शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडविल्या नाहीत तर भविष्यात “पेरा बंद” आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकरी नेते देविदास कणखर पाटील यांनी दिला.
हे निवेदन देविदास किसनराव कणखर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यालयात सादर करण्यात आले. निवेदनावर एकनाथ थुट्टे पाटील, मुरली महाराज येवले, दिनकर घुबे, प्रकाश घुबे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.