खरीप हंगाम तोंडावर आला असताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डिझेलसाठी मोठी पायपीट करावी लागत आहे.
डिझेल टंचाईवरून प्रशासनावर सडकून टीका; कॅनमधून डिझेल देण्याची मागणी
चिखली (Farmer Protest) : खरीप हंगाम तोंडावर आला असताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डिझेलसाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. अशा परिस्थितीत जालना जिल्ह्यातील धर्तीवर बुलढाणा जिल्ह्यातही शेतकऱ्यांना अधिकृत कॅन व बॅरलमधून डिझेल देण्याचा निर्णय तातडीने लागू करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
सरनाईक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील सत्ताधारी नेते सायकल रॅली काढून डिझेल बचतीचे दिखावे करत आहेत; मात्र प्रत्यक्षात डिझेलअभावी शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर शेतात उभे आहेत. पेट्रोल पंपावर तासन्तास रांगेत उभे राहून शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि डिझेल तिन्ही वाया जात आहे. प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
शेजारच्या जालना जिल्ह्यात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन ट्रॅक्टरचे आरसी बुक किंवा अॅग्रिस्टॅक आयडी तपासून अधिकृत कॅन व बॅरलमधून डिझेल देण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जालना प्रशासन शेतकऱ्यांसाठी असा निर्णय घेऊ शकते, तर बुलढाणा प्रशासन का घेऊ शकत नाही, असा सवालही सरनाईक यांनी उपस्थित केला.
“फक्त ‘डिझेल मुबलक आहे’ अशा घोषणा करून उपयोग नाही. शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष हाल थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना आवश्यक आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी वेळीच निर्णय घेतला नाही, तर २५ तारखेला होणाऱ्या मोर्चात शेतकऱ्यांचा संताप उफाळून येईल,” असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, जालना पॅटर्न बुलढाणा जिल्ह्यात लागू होणार का, याकडे आता शेतकरी व नागरिकांचे लक्ष लागले आहे.