रिसोड शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या शिंगाळा परिसरातील शेतशिवारात सरकारी रस्त्याच्या वादातून दोन शेतकऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे.
नगरपरिषदेच्या गटनेत्यासह तिघांवर गुन्हा दाखल; शिंगाळा शेतशिवारातील घटना
रिसोड (Farmer Attack) : रिसोड शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या शिंगाळा परिसरातील शेतशिवारात सरकारी रस्त्याच्या वादातून दोन शेतकऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. २३ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून जखमी शेतकऱ्यांवर रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणात रिसोड नगरपरिषदेचे गटनेते तथा माजी नगराध्यक्ष प्रतिनिधी कृष्णा महाराज आसनकर यांच्यासह चौघांविरोधात गुन्हा दाखल झाल्याने प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आसनगल्ली येथील कैलास मधुकर सरोदे (वय ३७) यांनी रिसोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, शिंगाळा परिसरातील गट क्रमांक २९३ मध्ये कैलास सरोदे, दत्ता मधुकर सरोदे व सतीश सुरेश सरोदे यांची शेती असून लगतच्या गट क्रमांक २८२ मध्ये कृष्णा लिंगाप्पा आसनकर यांची शेती आहे. शेतात जाणाऱ्या सरकारी रस्त्याच्या वापरावरून दोन्ही पक्षांमध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता.
खरीप हंगामाच्या मशागतीचे काम सुरू असताना शेतात हळदीचे बेड पाडण्याचे काम सुरू होते. त्यावेळी कृष्णा लिंगाप्पा आसनकर, चैतन्य हर्षवर्धन आसनकर, सोहम राम आसनकर व सुशील कैलास इंगळे हे काही साथीदारांसह तेथे आले. त्यांनी दत्ता सरोदे व सतीश सरोदे यांच्यावर लोखंडी रॉड व दगडांनी अचानक हल्ला केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या हल्ल्यात दोन्ही शेतकरी गंभीर जखमी झाले.
दरम्यान, ट्रॅक्टर चालक विजय वायभासे व त्याच्या साथीदाराने भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोरांचे आक्रमक रूप पाहून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी रिसोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.