सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही केवळ बनवाबनवी असून, शेतकऱ्यांना प्रत्यक्षात दिलासा मिळत नाही, अशी जोरदार टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
राज्यात नैतिकतेचा ऱ्हास झाल्याचा आरोप
नागपूर (Farm Loan Waiver): सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही केवळ बनवाबनवी असून, शेतकऱ्यांना प्रत्यक्षात दिलासा मिळत नाही, अशी जोरदार टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा केल्याशिवाय कर्जमाफीचा खरा फायदा होणार नाही, अशी ठाम मागणी त्यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
वडेट्टीवार म्हणाले की, सध्याच्या कर्जमाफी योजनेमुळे शेतकऱ्यांचे उर्वरित कर्ज कायम राहते. त्यामुळे भविष्यात नवीन कर्ज मिळवताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. पीकविमा योजनेतून केवळ विमा कंपन्यांचा फायदा होत असून, शेतकरी मात्र मदतीपासून वंचितच राहत असल्याची टीका त्यांनी केली.
राजकारणातील नैतिकता संपुष्टात
महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला असून, राजकारणातील नैतिकता संपुष्टात आली आहे. 'आधी डोक्यावर घ्यायचे आणि नंतर पायाखाली तुडवायचे हीच आता फॅशन झाली आहे,' अशा शब्दांत त्यांनी टीका केली.
सत्ताधारी गोटात सर्व काही सुरळीत नसल्याचे सांगत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या मंत्र्यांमध्ये अस्वस्थता असल्याचा दावा केला. राज्य कर्जबाजारी होत असताना सत्तेसाठी खेळ सुरू असून, जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मुंबई महापालिकेतील नगरसेवक निधीच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारवर पक्षपातीपणाचा आरोप केला. विकास निधी वाटप करताना सर्वांना समान न्याय मिळणे आवश्यक असताना विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना निधी न देणे ही लोकशाहीसाठी घातक बाब असल्याचे ते म्हणाले.