तालुक्यातील विरगव्हाण येथे सोमवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीने शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
विरगव्हाणमध्ये तीन शेतकर्यांचे नुकसान
नेर (Farm Fire) : तालुक्यातील विरगव्हाण येथे सोमवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीने शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. शेतातील धुरामुळे वनव्याचे रूप धारण केलेल्या आगीत तीन शेतकर्यांच्या पिकांचे व साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.
घटनास्थळावरील माहितीनुसार, दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास शेतातील धुरा पेटविण्यात आला. वार्याच्या झोतामुळे हा धुरा वेगाने पसरत जाऊन वनवा भडकला. या आगीत संतोष रामदास चव्हाण, प्रवीण भिकाजी पवार आणि निर्मला गोविंद जाधव यांच्या शेताचे नुकसान झाले. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे अर्धा एकर क्षेत्रावरील गहू पीक जळाले असून, जवळपास १२० प्लास्टिक पाईप आगीत नष्ट झाले आहेत.
दरम्यान, ही आग नेमकी धुरा पेटवल्याने लागली की अन्य कोणत्या कारणामुळे भडकली, याबाबत पोलीस तपास सुरू आहे. संबंधित महिलेने धुरा पेटवल्याची चर्चा असली तरी अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
घटनेची माहिती मिळताच नेर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दामोदर वाघमारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.