शहरात एका लग्नसोहळ्यात घडलेल्या दुहेरी हत्येच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
वर्धा (Family Dispute) : शहरात एका लग्नसोहळ्यात घडलेल्या दुहेरी हत्येच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. आनंदाच्या वातावरणात निघालेल्या वरातीतच पुतण्याने काका व चुलत भावावर धारदार शस्त्राने हल्ला करत त्यांचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ एप्रिल रोजी रात्री सुमारे साडेआठ वाजताच्या सुमारास महिला आश्रम परिसरातील हनुमान मंदिरातून नवरदेव व वरात दर्शन घेऊन बरबडी रोडवरील गजानन लॉनकडे विवाहासाठी निघाली होती. ढोल-ताशांच्या गजरात वरात आनंदात पुढे सरकत असतानाच अचानक ही थरारक घटना घडली.
भलमे कुटुंबातील जुन्या वैमनस्यातून संतापाच्या भरात पुतण्याने काका प्रभाकर भलमे आणि चुलत भाऊ रितेश भलमे यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. उपस्थितांनी तातडीने त्यांना सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला.
या घटनेमुळे लग्नाचा आनंद क्षणात शोकात बदलला. परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी वर्धा शहर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी पुतण्याला अटक केली असून तो अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, मागील वर्षी वाहनाला कट मारण्याच्या कारणावरून भलमे कुटुंबात वाद झाला होता. त्यावेळी सेवाग्राम पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्याच वादाचे रूपांतर आता दुहेरी हत्येत झाल्याचे बोलले जात आहे.