वर्धा जिल्ह्यातील नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर हिंगणघाट नजीक आज भीषण अपघाताची घटना घडली.
वर्धा (Family Accident) : वर्धा जिल्ह्यातील नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर हिंगणघाट नजीक आज भीषण अपघाताची घटना घडली. महामार्गावरील हॉटेल सगुना फॅक्टरीजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने मोपेड दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये पती, पत्नी आणि त्यांच्या 6 वर्षीय चिमुकलीचा समावेश आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मृतांची ओळख गजानन वानखेडे (वय 45), पल्लवी वानखेडे (वय 38) आणि आरोही वानखेडे (वय 6, रा. कुर्ला, ता. समुद्रपूर) अशी झाली आहे. वानखेडे कुटुंब सासरवाडीहून हिंगणघाट शहरात कपडे खरेदीसाठी मोपेड दुचाकीने निघाले होते.
प्राथमिक माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असताना हॉटेल सगुना फॅक्टरीजवळ विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातात गजानन, पल्लवी आणि आरोही हे तिघेही रस्त्यावर फेकले गेले.
गंभीर दुखापतीमुळे तिघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. तातडीने रुग्णवाहिका बोलावून तिघांनाही उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
या घटनेतील सर्वात हृदयद्रावक बाब म्हणजे मृत झालेली आरोही ही जुळी बहीण होती. तिची दुसरी जुळी बहीण सुदैवाने बचावली असली तरी आई-वडील आणि बहिणीच्या निधनामुळे ती पोरकी झाली आहे.
एका आनंदी कुटुंबाचा क्षणात झालेला अंत पाहून कुर्ला आणि हिंगणघाट परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, अज्ञात वाहनचालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.