गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, आरमोरी व कुरखेडा तालुक्यांमध्ये रानटी हत्तींच्या कळपाने हैदोस मांडला असून शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेण्याचे काम सुरू आहे.
33 हत्तींचा कळप ठाण मांडून
गडचिरोली (Elephant Attack) : गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, आरमोरी व कुरखेडा तालुक्यात रानटी हत्तीच्या कळपाने हैदोस मांडला असून शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेण्याचे काम या हत्तीच्या कळपाने सुरू केले आहे. उभे पीक नेस्तनाबूत होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
सध्या हत्तीचा कळप उसेगाव परिसरात ठाण मांडून असून उसेगाव येथील विमलबाई तुमरेटी, अल्का जीवन कुमोटी यांच्या शेतातील आंबा, पईप, ताळ या झाडांचे तसेच धान, मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. फळझाडे जगवण्यासाठी शेतकऱ्यांना 20 ते 25 वर्षे मेहनत घ्यावी लागते. मात्र रानटी हत्तींचा कळप एका दिवसात होत्याचे नव्हते करून सोडत आहे.
प्रतीक्षा जनार्धन ठुनेकार यांच्या धान शेतीचे तसेच विमल तुमरेटी, अल्का जीवन कुमोटी यांच्या मका पिकाचे मोठे नुकसान झाले. कृष्णाजी राऊत यांच्या शेतातील मिरची पीक या हत्तीच्या कळपाने पायदळी तुडवले.
झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सचिव मधुकर रेवाडे यांनी केली आहे.