वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदा सोयाबीनच्या बोगस बियाण्यांमुळे दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.
परिवर्तन शेतकरी संघटनेचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन; शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची मागणी
मानोरा : वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदा सोयाबीनच्या बोगस बियाण्यांमुळे दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. खुल्या बाजारातून सोयाबीन खरेदी करून ते कंपनीच्या नावाने बॅगांमध्ये भरून विक्री केल्याने हजारो शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत परिवर्तन शेतकरी संघटनेचे नेते मनोहर राठोड यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन देऊन संबंधित सोयाबीन कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यासह शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मानोरा तालुक्यातील जवळपास ३० टक्के शेतकऱ्यांच्या पेरण्या उलटल्या आहेत. शेतकऱ्यांनी कृषी केंद्रातून "पांढऱ्या फुलांचे" सोयाबीन बियाणे खरेदी केले, मात्र त्या बियाण्याला अंकुरच फुटला नाही. याला संबंधित सोयाबीन कंपन्या जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सन २०२५ मध्ये वाशिम व कारंजा बाजारातून कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदी केल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यानुसार आरव्हीएसएम ११३५ या वाणाचे सोयाबीन ६,००० ते ७,५०० रुपये प्रति क्विंटल, विहार बायोटेकचे ७,५०० ते ९,२०० रुपये, रवी सिड्सचे ६,००० ते ७,५०९ रुपये, विस्तारा कंपनीचे ५,५०० ते ६,५०० रुपये आणि ३३५ वाणाचे सोयाबीन ४,८०० ते ५,२०० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करून ते बियाणे म्हणून कंपनीच्या नावाने विक्री करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या कथित बोगस बियाण्यांमुळे शेतात उगवण न झाल्याने शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करावी लागत आहे. त्यामुळे बियाणे, मशागत आणि मजुरीचा दुहेरी खर्च शेतकऱ्यांच्या पदरात पडला आहे. तसेच "पांढऱ्या फुलांचे" हजारो क्विंटल सोयाबीन कंपन्यांनी कसे तयार केले आणि किती शेतकऱ्यांना फाऊंडेशन बियाणे दिले, याचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
परिवर्तन शेतकरी संघटनेने बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांवर तातडीने फौजदारी कारवाई करून दुबार पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर आर्थिक मदत जाहीर करावी, तसेच जिल्ह्यातील बियाणे विक्रीवर कडक नियंत्रण ठेवून विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी केली आहे.
वाशिम हा आकांक्षित जिल्हा असतानाही शेतकऱ्यांना सातत्याने नैसर्गिक तसेच आता मानवनिर्मित संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित सोयाबीन कंपन्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिवर्तन शेतकरी संघटनेने कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे.