मान्सून तोंडावर आला असताना शहरातील मोठ्या नाल्यांची स्वच्छता मोहीम नगरपालिकेने हाती घेतली आहे.
पावसाळ्यात पूरस्थितीचा धोका कायम; नागरिकांकडून चौकशीची मागणी
हिंगोली (Drain Cleaning) : मान्सून तोंडावर आला असताना शहरातील मोठ्या नाल्यांची स्वच्छता मोहीम नगरपालिकेने हाती घेतली आहे. जेसीबीच्या साहाय्याने नालेसफाईचे काम सुरू असल्याचे दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात ही सफाई केवळ वरवरचीच ठरत आहे. शहरातील मुख्य नाल्यांमध्ये वर्षानुवर्षे साचलेला गाळ काढण्याऐवजी फक्त वरचा कचरा आणि झाडेझुडपे बाजूला केली जात आहेत. नाल्याच्या तळाशी खोलवर रुजलेला, घट्ट झालेला गाळ तसाच शिल्लक राहत असल्याने नाल्यांची वहनक्षमता वाढलेलीच नाही.
छायाचित्रात दिसते त्याप्रमाणे, नाल्याच्या काठावर जेसीबी उभी असून केवळ काठावरील माती व कचरा उचलला जात आहे. मध्यभागी मोठ्या प्रमाणात काळा गाळ, प्लास्टिकच्या बाटल्या, कचरा आणि सांडपाणी साचलेले स्पष्ट दिसत आहे. खोलवरचा गाळ न काढल्यामुळे नाल्याची खोली वाढलेली नाही. परिणामी पावसाळ्यात जोराचा पाऊस झाल्यास हे नाले तुंबून संपूर्ण पाणी जवळपासच्या नागरी वसाहतींमध्ये घुसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मागील वर्षी देखील शहरातील अनेक भागांमध्ये पावसाचे पाणी घरांमध्ये शिरून नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. यंदाही तोच अनुभव पुन्हा येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नगरपालिका प्रशासन केवळ कागदोपत्री नालेसफाई दाखवत असून प्रत्यक्षात कामात गंभीर दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. दरवर्षी लाखो रुपये खर्च करूनही नाल्यांमधील मुख्य अडथळा असलेला गाळ काढला जात नसल्याने हा निधी वाया जात आहे. पावसाळ्यापूर्वी होणारी ही कामे केवळ देखाव्यापुरती मर्यादित राहिल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या गंभीर परिस्थितीमुळे नागरिकांनी आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. मान्सूनपूर्व नालेसफाईच्या नावाखाली सुरू असलेल्या या कामाची चौकशी करावी आणि संबंधित यंत्रणेला तळातील गाळ पूर्णपणे काढून नाल्यांची खोली व रुंदी वाढवण्याच्या सक्त सूचना द्याव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
प्रशासनाने वेळीच गांभीर्याने दखल घेतली नाही तर पावसाळ्यात शहरात भीषण पूरपरिस्थिती निर्माण होऊन जीवित व वित्तहानी होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. केवळ वरवरची मलमपट्टी न करता शास्त्रोक्त पद्धतीने नाल्यांची स्वच्छता करणे अत्यावश्यक बनले आहे.